राष्ट्रवादी कॉंग्रेसचा भाजप शहराध्यक्षांवर पलटवार
गावांच्या समस्यांवर चर्चा करण्याचा नैतिक अधिकार नाही
पुणे – भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी कधीच महापालिकेचे प्रतिनिधित्व केलेले नाही. त्यामुळे त्यांना महापालिकेतील घडामोंडीची कल्पना नाही. त्यातून त्यांनी समाविष्ट केलेल्या 23 गावांबाबत विधान केले आहे. त्यामुळे मुळीक यांनी महाविकास आघाडीची चिंता न करता आपल्या अपयशाची चिंता करावी, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसने लगावला आहे.
मुळीक यांनी “या गावांमध्ये गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीची सत्ता होती. या काळात त्यांना या गावांचा विकास करता आला नाही त्यामुळेच ही गावे महापालिकेत घेण्याचा आग्रह राष्ट्रवादी करत आहे,’ अशी टीका सोमवारी केली होती.
सोबतच त्यांनी या गावांमधील नागरिकांशी संवाद मोहीम सुरू केली आहे. मुळीक यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महापालिकेतील माजी पदाधिकाऱ्यांनी समाचार घेतला आहे. याबाबत माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे पत्रकार परिषद घेऊन मुळीक यांच्या आरोपांना उत्तर दिले.यावेळी शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप धुमाळ उपस्थित होते.
धनकवडे म्हणाले, “ही गावे घेण्याचा ठराव महापालिकेच्या मुख्यसभेत करण्यात आला, त्यावेळी भाजपने ठरावाच्या बाजूने मतदान केले होते, याचा विसर मुळीक यांना पडला आहे. समाविष्ट 11 गावांसाठीचा निधी याच भाजपने मुख्यसभेत वर्गीकरण करून इतर कामांसाठी वापरला असून आता या गावांचा विकास का नाही झाला, असा गळा मुळीक काढत आहेत.?
तर, “या 34 गावांचा निर्णय शासनाने घेतला, त्यावेळी या गावांमध्ये भाजपचे आमदार होते. मग त्यांना विकास का करता आला नाही,?’ असा सवाल चांदेरे यांनी केला. “ही 11 गावे घेताना महापालिकेने शासनाकडे 2 हजार कोटींचा निधी मागितला, मात्र,राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने एक दमडीही महापालिकेस अनुदानापोटी दिलेला नाही. तर न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा विसरही भाजप सरकारला पडला. त्यामुळे टप्प्याटप्प्याने गावे घेण्याऐवजी आता एकदाच ही गावे घ्यावी लागत आहेत,’ असे चांदेरे म्हणाले.