अमोल मतकर
संगमनेर – शहरातील जोर्वे नाका परिसरात झालेल्या किरकोळ वादामुळे दोन समाजात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने दुसऱ्याच दिवशी भांडणाचे मूळ असलेले रस्त्यावरील अतिक्रमण काढून टाकले. त्यामुळे शहरातील इतर भागात असलेले अतिक्रमानधारक कारवाई करण्याआधीच निघून गेल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. लवकरच कत्तलखान्यांवर ही कारवाई होऊन अनधिकृत बांधकाम असलेले घरे किंवा शेड भुईसपाट करणार असल्याची खात्रीलायक माहिती दैनिक “प्रभात’ला मिळाली आहे.
शहरातील जोर्वे नाक्यावर हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांना मारहाण झाली होती. त्याठिकाणी असलेल्या अतिक्रमणामुळे नेहमी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे तेथे आशा घटना नेहमीच घडत होत्या. तेथून जातायेता जीव मुठीत धरून जावे लागत कारण चुकून कुणाला धक्का लागला तरी रिकामटेकडे भाई दादा तेथे जमा होऊन प्रवाशांना मारहाण करत होते. जोर्वे, वाघापूर, खराडी, कोल्हेवाडी, संगमनेर खु, आशा अनेक ग्रामीण भागातून शेतकऱ्यांच्या मुली त्या ठिकाणाहून शाळेत कॉलेजला जा-ये करतात.
त्या परिसरात बसलेल्या टवाळखोर लोकांकडून त्यांना चांगली वागणूक मिळत नसे. तसेच तेथील काही मुलं त्या मुलींची छेड काढण्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न तेथील अतिक्रमण हा होता. हे अतिक्रमण काढावे म्हणून अनेकांची मागणी होती. आज ती मागणी पूर्ण झाली. जेथे अवैध धंदे सुरू असतात त्याठिकाणचे बांधकाम परवाना तपासून त्यावर लवकरच हातोडा पडणार आहे. त्यामुळे शहरातील कत्तलखानेही नष्ट होतील.
बसस्थानक रस्त्यावर अतिक्रमणे ‘जैसे थे’च
काही प्रमाणात अतिक्रमण निघाले असले तरी बसस्थानक जवळ असणारे रिक्षा स्थानक आणि इंजिनिअरिंग कॉलेज पासून बसस्थानकपर्यंत मोठा रास्ता झाला असला तरी दोन्ही बाजूने त्यावर अतिक्रमण अजूनही तसेच असल्याने प्रशासनाने याकडेही लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करत आहेत.