मेणवली – बलकवडी धरण पायथ्यालगतचा बलकवडी गावाकडे जाणारा डांबरी रस्ता बुधवारी मध्यरात्री मोठ्या प्रमाणात खचला आहे. त्यामुळे अन्य गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, याच रस्त्यावर असणारा एकमेव पूलही शेवटच्या घटका मोजत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने पुलाच्या दोन्हीकडील कठड्यानी व तळातील खांबानी जागा सोडली आहे. पुलाखालून कृष्णा नदीचे खोल पात्र भरून वाहत असल्याने या परिसरातील नागरिकांचा प्रवास जीवघेणा ठरत आहे. वाईपासून 25 कि.मी. अंतरावरील बलकवड़ी धरण परिसरात सततच्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे येथील संपूर्ण परिसर जलमय झाला आहे.
डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे ओढ़े नाले तुडुंब वाहत असल्याने सर्व गावांना जोडणारे रस्ते व पुलावरील वाहतूक बंद झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुसळधार पावसाने दळणवळण ठप्प होवून एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुळातच बलकवडी धरण परिसरातील गावे अनेक सोयीसुविधापासून वंचित आहेत. त्यामध्ये मुसळधार पावसाने भर घालून संपर्क तोडल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. वाईला ये-जा करण्यासाठी असणारी वाटच बंद झाली आहे.
मात्र तरीही याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याने खेद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गैरसोयींमुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याल कोण जबाबदार? असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे. बलकवडी धरणालगतची सर्व गावे डोंगरात असल्याने संकटात आणखी भर पडत असल्याने येथील रहिवाशी भीतीच्या सावटाखाली आहेत. शासकीय यंत्रणेला पोहोचण्यास उशीर होत असला तरी या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेवून प्रशासन व राजकीय नेत्यांनी तात्काळ दखल घेवून दुर्घटना घडण्याची वाट न बघता तातडीने योग्य ती उपाय योजना करण्याची मागणी नागरिकातून केली जात आहे.