नवी दिल्ली- मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडणे असे सरकारकडून करोनाची पहिली लाट आल्यापासूनन सांगितले जात होते. मात्र आता त्याहीवर नव्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्या म्हणजे तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या समवेत असाल तरीही मास्क वापरा अर्थात घरात असतानाही मास्क घालण्याची गरज असल्याचे त्यातून सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे करोनाचा धोका आता अत्यंत गंभीर झाला असल्याचे स्पष्ट होते आहे.
ऑक्सिजनची कमतरता, रूग्णालयांत बेड न मिळणे, लसींची टंचाई, व्हेंटिलेटरची टंचाई या सगळ्यांचा सामना करत असताना आता घरातही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत निती आयोगाचे व्हि. के. पॉल यांनी सूचित केले आहे. ते म्हणाले की, विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये. तुमच्या कुटुंबातील सदस्यांसमवेत असाल तरी मास्क घाला आणि बाहेरच्या कोणालाही घरी बोलावू नका. दरम्यान, लसीकरणाबाबत बोलताना ते म्हणाले की या मोहीमेचा वेग कमी करणे आपल्याला परवडणारे नाही. उलट आताची स्थिती पाहता त्याचा वेग आणखी वाढवण्याची गरज आहे. लस केव्हा घ्यावी अथवा घेऊ नये याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यानुसार महिलांनी मासिक पाळीच्या काळात लस घ्यावी का, असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी लस घ्यावी. लस घेणे पुढे ढकलण्याचे काहीही कारण नसल्याचे स्पष्ट शब्दांत स्पष्ट केले.