संयुक्तराष्ट्रे – दिल्लीत आंदोलनकारी शेतकरी आणि पोलिसांमध्ये जी चकमक आणि हिंसाचार झाला त्यावर संयुक्तराष्ट्रांच्या सरचिटणीसांनी चिंता व्यक्त केली असून शांततापुर्ण आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा अधिकार मान्य केला जावा अशी अपेक्षा त्यांनी भारत सरकारकडे व्यक्त केली आहे.
संयुक्तराष्ट्र सरचिटणीसांच्या प्रवक्त्याने कालच्या घटनेवर प्रतिक्रीया देताना ही भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, दिल्लीत या आंदोलनाच्यावेळी हिंसांचार झाला आहे. तथापि आमचे अशा सर्व घटनांच्या संबंधात नेहमीच म्हणणे असते की कोणत्याही सरकारने शांततापुर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा नागरीकांचा अधिकार मान्य केला पाहिजे. आंदोलकांनीही हिंसाचार टाळला पाहिजे. दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराच्या संबंधात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वरील प्रतिक्रीया दिली. तथापि त्यावर अधिक भाष्य करणे मात्र त्यांनी टाळले.