मुंबई – मैदानावरील पंचांनी पायचित किंवा धावबादचा दिलेला निर्णय रिप्लेमध्ये योग्य नसल्याचे दिसून आले तर हा निर्णय बदलण्याचा अधिकार तिसऱ्या पंचाला देण्यात आला आहे. त्यामुळे मैदानावरील पंचांपेक्षा जास्त अधिकार तिसऱ्या पंचाला देण्यात आले आहेत. मात्र, फलंदाजाविरुद्ध पायचितबाबत दाद मागताना निर्णायक भूमिका बजावणारा पंचांचा कौल (अंपायर्स कॉल) यापुढेही कायम राहणार आहे, असे आयसीसीने जाहीर केले आहे.
डीआरएसमधील तीन मोठे बदल
– बेल्सला स्पर्श करणाऱ्या चेंडूवरही फलंदाज बाद दिला जाणार
– क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला फलंदाजाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला की नाही, हे विचारून मग डीआरएस घेण्याचा अधिकार असेल
– शॉर्ट रनबाबत चुकीचा निर्णय मैदानावरील पंचांनी दिला, तर तिसऱ्या पंचांना रिप्ले पाहून तो निर्णय बदलण्याचे स्वातंत्र्य.
चेंडू यष्ट्यांना थोडा जरी स्पर्श करेल असे वाटत असल्यास फलंदाजाला बाद देण्यात यावे अशी मागणी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र, चेंडूचा यष्ट्य्ांना 50 टक्क्यांहून कमी स्पर्श होत असल्याचे वाटत असले तर त्याला बाद देण्याबाबत मैदानावरील पंचांनी दिलेला निर्णय महत्त्वाचा राहील, असेही अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखालील झालेल्या आयसीसीच्या क्रिकेट समितीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, करोनाचा धोका कायम असेपर्यंत आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तसेच एखाद्या दौऱ्यावर जाताना संघांना 23 खेळाडू व सपोर्ट स्टाफचे सात सदस्य अशा एकूण 30 जणांना घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.