पुणे – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात लॉकडाउन करण्यात आले आहे. मात्र लॉकडाउन 3 सुरू होण्याच्या वेळी अर्थात 3 मे रोजी काही नियम आणि अटी शिथिलही करण्यात आल्या आहेत. त्यात जीवनावश्यक वस्तूंसोबत या सदरात न मोडणाऱ्या मात्र तरीही त्यांची गरज असलेल्या वस्तूंच्या विक्रीस सशर्त सुट देण्यात आली. मात्र यंत्रणा राबविणाऱ्या व्यक्ती अथवा प्रशासनातील व्यक्ती आपापल्या परीने याचा अर्थ काढत अंमलबजावणी करत असल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांत पाहायला मिळते आहे. त्यामुळे जी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे, ती म्हटले तर हास्यास्पद तर आहेच पण त्याहीपेक्षा गोंधळ अधिकच वाढविणारी आहे.
शहरात संक्रमित झोन वगळून दुकाने खुली करण्यास परवानगी दिली गेली आहे. एका रस्त्यावर पाच दुकांनापेक्षा जास्त दुकाने खुली असू नयेत, असे सांगण्यात आले आहे. आता दुकाने सुरू करायची म्हणजे तेथे कामगार आले. त्या कामगरांचे घर ते दुकानापर्यंतचा प्रवासही आला. ते कामाच्या ठिकाणी पोहोचले तरच काम करू शकणार. या सर्व बाबी निर्णय घेताना गृहीत धरणे अपेक्षित आहेत. तशा त्या गृही धरल्या गेल्या असाव्यात असे वाटत होते.
मात्र कामासाठी जाणाऱ्या या कामगारांनाच रोखले जात आहे. एखादा कामगार प्रतिबंधित क्षेत्रातील असेल आणि जर तो प्रतिबंध नसलेल्या क्षेत्रात कामावर जात असेल आणि त्याला रोखले गेले तर ते एकवेळ समजू शकते. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हाच उपाय आहे. मात्र सरकसकट सगळ्यांनाच हटकले जात असेल आणि पास मागितला जात असेल, तर हा प्रकारच हास्यास्पद ठरतो. अशा प्रकाराला सामोरे जावे लागलेल्या काही कामगारांनी प्रभात कार्यालयाला फोन करून आपली ही व्यथा मांडली आहे.
यातील दुसरा भाग असा की जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंच्या विक्रीला परवानगी दिली गेली आहे. याचा अर्थ त्या वस्तू जीवन- मरणाशी निगडीत जरी नसल्या तरी यांची गरज असते. अशा अनेक वस्तू आहेत की त्यांचा उल्लेख करणे अवघडलेपण आणणारे असते. पण त्यांची गरज आणि उपयुक्तता असते. जर एखादा ग्राहक अशी वस्तू खरेदी करण्यासाठी जात असेल तर त्याला रोखल्यावर त्याने यावर काय उत्तर द्यावे? ती वस्तू त्याच्यासाठी आवश्यक आहे की नाही, त्याचा निर्णय नियमांची अंमलबजावणी करणारे रस्त्यावरील अंमलदार घेणार का? अशा ग्राहकांना जर तेथूनच परतून लावले आणि त्यांना खरेदीसाठी पुढे जाउच दिले नाही तर मग दुकाने सुरू करण्याच्या हेतूलाच हरताळ फासला जात नाही का, याचाही विचार व्हायला हवा.
कोणताही व्यवसाय हा कामगार आणि मुख्य म्हणजे तेथे येणारे ग्राहक यांच्यावरच अवलंबून असतो. जर या दोन प्रमुख घटकांना प्रतिबंधित, अप्रतिबंधित, पास, जीवनावश्यक वस्तू अशा वर्गीकरणांत आणि याद्यांत टाकून तोलले गेले तर दुकाने सुरू करण्याच्या नुसत्या आदेशाला काहीच अर्थ राहत नाही.
निर्णय घेतल्यावर त्याचा मतितार्थ समजून तारतम्याने राबविले जाणे महत्वाचे असते. केवळ ओळींवर बोट ठेवले गेले तर संभ्रम आणि गोंधळच निर्माण होतो व एकूणच सर्व प्रकार हास्यास्पद ठरतो.