आमदार सुनील शेळके यांचा आजपासून पाहणी दौरा
कामशेत – परतीच्या पावसामुळे मावळातील भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात मावळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे जाता आले नाही, यामुळे निवडणुकीच्या विजयानंतर सर्वप्रथम मावळातील पीक पाहणी दौरा करणार असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.
ऑक्टोबर महिना संपत आला तरी देखील मावळातील पाऊस थांबत नसल्याने मावळातील भातपिकावर संकट येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मावळातील पहिल्या टप्प्यातील भात लागवडी सप्टेंबर अखेरीस कापणी योग्य झालेली असतात; मात्र यावर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत सतत पाऊस सुरू असल्याने भातपीक कापणीस आलेले असून, देखील शेतकऱ्यांना पावसामुळे वेळेत कापणी करता येत नसल्याने पिके अतिपावसामुळे भुईसपाट होण्यास सुरवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांची पिके खाचारातच पडली आहेत. त्यांचे पूर्णपणे नुकसान झाले असून, पीक उत्तम आलेले असताना देखील यावर्षी त्यांच्या हाती काहीच लागणार नाही, पुढील काही काळ मावळत असाच पाऊस सुरू राहिल्यास तांदळाचे कोठार असलेल्या मावळात तांदूळ मिळणे मुश्किलीचे होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
मावळात सातत्याने सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे प्रामुख्याने पहिल्या टप्प्यातील भात लागवडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.पाऊस सुरु असल्याने पिक कापणी करणे देखील शेतकऱ्याना शक्य होत नाही. आधुनिक यंत्राच्या सहाय्याने पिक कापणी केल्यास पेंढा हाती लागत नाही. शेतातून हे अवजड यंत्र फिरल्याने मशागतीचा खर्च वाढत असल्याने सर्वच शेतकरी आधुनिक यंत्राच्या सहाय्याने पिक कापणीस धजावत नाहीत. पाऊस सुरु असल्याने शेतीची सर्वच कामे खोळंबली असून भात कापणीला झालेल्या उशिराचा रग्बी पिकांवर देखील विपरीत परिणाम होणार आहे, यामुळे मावळातील भात उत्पादक शेतकरी आता पाऊस उघडण्याची वाट पाहू लागला आहे.
मावळ विधानसभा निवडणुकीच्या कामकाजामुळे सरकारी यंत्रणा व्यस्त असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे निवडणुकीच्या काळात कृषी विभागाने लक्ष दिले नाही आणि निवडणुकीनंतर दिवाळीच्या सुट्ट्या लागल्याने कर्मचारी सुट्टीवर गेल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र नवनिर्वाचित आमदार शेळके हे सर्व प्रथम मावळातील पीक पाहणी करणार असल्याने कृषी विभागाने सुट्टी रद्द केली आहे.