नवी दिल्ली – बऱ्याच राज्यांनी करोनाचे निर्बंध पूर्णपणे हटविले आहेत. त्याचबरोबर लसीकरण वेगात झाल्यामुळे रिटेल क्षेत्रातील विक्री वेगाने पूर्वपदावर येऊ लागली आहे. सपतटेबर महिन्यांमध्ये रिटेल विक्री मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने म्हटले आहे.
या संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपाल आणि यांनी सांगितले की, 2019 च्या सप्टेबर महिन्यामध्ये रिटेल विक्री ज्या प्रमाणात वाढली होती त्याच्या 96 टक्के विक्री सप्टेंबर 2021 मध्ये झाली आहे. लवकरच हे क्षेत्र पूर्णपणे पूर्वपदावर येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, दक्षिण भारतामधील विक्री 33 टक्क्यांनी, पूर्व भारतातील विक्री 30 टक्क्यांनी, पश्चिम भारतातील विक्री 29 टक्क्यांनी तर उत्तर भारतातील विक्री 16 टक्क्यांनी वाढली असल्याचे आम्ही केलेल्या पाहणीमध्ये आढळून आले आहे. उत्तर भारतामधील परिस्थिती आणखी पूर्ववत झालेली नाही. कारण तेथील ग्राहकांच्या क्रयशक्तीवर बराच परिणाम झाला आहे. त्याचबरोबर उत्तर भारतातील लसीकरण कमी झाले आहे. आगामी काळामध्ये परिस्थिती पूर्ण भारतात वेगाने पूर्वपदावर येईल असे ते म्हणाले.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, अन्नधान्य, किराणा या क्षेत्रातील विक्री वेगाने पूर्वपदावर येत असून यामध्ये दहा टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाली असल्याचे ते म्हणाले. मात्र खेळाचे साहीत्य, कपडे, इत्यादीची विक्री आणखी पूर्वपदावर आलेली नाही.
हाच प्रकार कपडे आणि दागिन्याच्या बाबत झाला आहे. मात्र उत्सवाच्या काळामध्ये ही विक्री वाढेल अशी आशा असल्याचे त्यांनी सांगितले. दसरा आणि दिवाळीमध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याची प्रथा आहे. जर तिसरी लाट आली नाही तर दसरा आणि दिवाळीमध्ये ही विक्री 100 टक्के पूर्वपदावर येण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.