पाटणा – बिहार मधील हिलसा मतदार संघातील अत्यंत चुरशीची व वादग्रस्त ठरलेली निवडणूक अखेर जेडीयु म्हणजेच संयुक्त जनता दलाचे उमेदवार कृष्णमुरारी शरण यांनी जिंकली आहे. ते केवळ 12 मतांनी विजयी घोषित करण्यात आले आहेत.
तथापि ही निवडणूक तेथील राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार शक्तीसिंह यांनी 547 मतांनी जिंकल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले होते, त्यांना विजयाचे सर्टिफिकीटही लवकरच दिले जाईल, असे त्यांना सांगण्यात आले होते; पण नंतर हा निर्णय फिरवला गेला, असा आरोप राष्ट्रीय जनता दलाने केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून फोन आल्यानंतर हा निकाल फिरवला गेला असा आरोप राष्ट्रीय जनता दलाने केला आहे. येथील पोस्टाने आलेली सर्व मते बाद ठरवून आमच्या उमेदवाराला पराभूत घोषित करण्यात आले आहे असा आरोप या पक्षाने केला आहे.
मंगळावारी रात्री उशिरापर्यंत या मतदार संघातील मतमोजणीचा हा घोळ सुरू होता. शेवटी निवडणूक आयोगाने जो अधिकृत निर्णय जाहीर केला त्यानुसार संयुक्त जनता दलाचे उमेदवार शरण यांना 61 हजार 848 तर राजदचे उमेदवार शक्तीसिंह यादव यांना 61 हजार 836 मते मिळाली. मतांमधील हा फरक केवळ बारा मतांचा आहे. या मतमोजणीत कोणतीही गडबड झालेली नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.