कोणत्याही व्यक्तीच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या इयत्ता दहावीचा राज्य मंडळाचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये करोना विषाणूने संपूर्ण जगालाच ग्रासून टाकले असल्याने त्याच पार्श्वभूमीवर या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणेच चांगले मार्क्स मिळवले आहेत आणि निकालाची टक्केवारीही चांगली आहे; पण या निकालाचा निखळ आनंद घेण्याची परिस्थिती आणि मन:स्थिती कोणाकडे नाही हे वास्तवही नाकारून चालणार नाही. मुळात हा निकाल दीड महिना उशिरा जाहीर करण्यात आला. सर्वसाधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा निकाल येतो. यावेळी तो जुलै महिन्याच्या अखेरीस जाहीर झाला.
अर्थात, हा फक्त ऑनलाइन निकाल आहे. प्रत्यक्षात गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र विद्यार्थ्यांच्या हातात मिळण्यास आणखी पंधरा दिवसांचा कालावधी जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार सुरू होणार आहे. एकूणच सध्याच्या काळात शिक्षण क्षेत्राबाबत संपूर्ण अनिश्चितता असल्याने दहावीचा निकाल लागला असूनही पालकांना आपल्या पाल्याच्या भवितव्याबाबत काही निश्चित असे ठरवता येईल अशी कोणतीही लक्षणे सध्या दिसत नाहीत.
विद्यार्थी नववीच्या वर्गात जाताच पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनातही आपल्या भवितव्याबाबत नियोजन आणि विचार सुरू झालेले असतात. दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कोणती शाखा निवडायची आणि कशामध्ये करिअर करायचे याबाबत निश्चित नियोजन किंवा रूपरेखा आखण्यात आलेली असते.
लाखो विद्यार्थ्यांच्या पालकांनी अशा प्रकारचे नियोजन दोन वर्षांपूर्वीच केले असणार; पण आता दहावीचा निकाल लागल्यानंतर त्यापैकी कोणतेही नियोजन प्रत्यक्षात येण्यामध्ये किती अडचणी आणि अडथळे असणार आहेत याची कल्पना आता पालकांना आली असणार आहे. नजीकच्या कालावधीमध्ये राज्यात कोठेही महाविद्यालय सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी राबवणार याबाबतही गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
एरवी सर्व काही सुरळीत चालू असतानाही अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत प्रचंड गोंधळ असतो. आता तर करोना महासंकटाच्या काळात सर्व यंत्रणा ठप्प असल्याने अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी राबवणार याबाबत सरकारने गांभीर्याने नियोजन करण्याची गरज आहे. बारावी आणि त्यापुढील वर्गांच्या ऑनलाइन शिक्षणाला सर्वत्र प्रारंभ झाला असला तरी अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष शिक्षणाला प्रारंभ होण्यास अद्याप दोन महिन्यांचा कालावधी लागल्यास आश्चर्य वाटायला नको.
दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयात शिक्षण घेण्यास विद्यार्थी खूपच उत्सुक असतो. एक प्रकारच्या वेगळ्या वातावरणात त्याचा प्रवेश होत असतो. शालेय जीवनापेक्षा एका वेगळ्याच आयुष्याचा अनुभव घेण्यास तो उत्सुक असतो; पण यावेळी अशी कोणत्याच प्रकारची उत्सुकता किंवा हुरहूर विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळेल असे दिसत नाही.
जरी अकरावीची प्रवेश प्रक्रिया विलंबाने का होईना, पण सुरळीत पार पडली तरी प्रत्यक्ष महाविद्यालयीन शिक्षणाला लगेच सुरुवात होईल, असे दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनातील गोंधळ आणि संभ्रम वाढण्याची शक्यता आहे. साहजिकच येत्या काही दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांना याबाबत समुपदेशन मिळायला हवे.
अकरावीसारख्या महत्त्वाच्या वर्षाची सुरुवात जर निराशाजनक पद्धतीने झाली तर त्याचा परिणाम आयुष्यातील शैक्षणिक आयुष्यावरही होऊ शकतो. दहावीची परीक्षा सुरू असतानाच करोना विषाणूचा प्रभाव वाढत असल्याने भूगोलाचा एक पेपर रद्द करण्यात आला होता. इतर विषयातील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना भूगोलमध्येही मार्क देण्यात येऊन निकाल लावण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आधीच ती एक टोचणी आहे.
एका विषयाची परीक्षा न देताही आपण उत्तीर्ण झालो आहोत ही टोचणी त्यांना आयुष्यभर सतावणार आहे. त्यातच आता निकाल ज्या परिस्थितीत आणि मन:स्थितीत जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची ही मानसिकता अधिकच निराशावादी आणि नकारात्मक होण्याची भीती लक्षात घेऊनच शिक्षण क्षेत्राने पावले उचलण्याची गरज आहे.
राज्य सरकार असो राज्य सरकारचा शिक्षण विभाग असो किंवा शिक्षण संस्था असोत आणि या शिक्षण संस्थांशी संलग्न महाविद्यालये असो सर्वांनीच आपापल्या पातळीवर प्रयत्न करून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्याची गरज आहे. या सर्वांमध्ये पालकांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. करोना संकटाचा फटका शिक्षण क्षेत्रालाही बसला आहे. त्यामुळेच दहावीनंतरच्या आयुष्यामध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाचे म्हणजे ही परिस्थिती बदलेल आणि पुन्हा एकदा महाविद्यालय शिक्षणाला प्रारंभ होईल हा आशादायक विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्याची गरज आहे. राज्यातील काही शहरांमध्ये आणि महानगरांमध्ये अद्यापही कडक लॉकडाऊन अमलात असल्याने चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आपले यश साजरे करण्यासाठी साधे पेढेही मिळणार नाहीत, हे वास्तवही आता स्वीकारावे लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने विद्यार्थ्यांची अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरळीत आणि गोंधळविरहीत केली तरच विद्यार्थ्यांना थोडाफार दिलासा मिळू शकेल.
राज्य बोर्डाव्यतिरिक्त इतर केंद्रीय बोर्डांच्या दहावी परीक्षांचे निकाल काही दिवसांपूर्वीच लागले आहेत. ते विद्यार्थीही आता आगामी प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यावर परिणाम करणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेच्या विषयाकडे सरकारने म्हणूनच गांभीर्याने बघण्याची गरज आहे.
अर्थात, केवळ गुणवान विद्यार्थीच नव्हे तर किरकोळ गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठीही प्रवेशाचा विषय महत्त्वाचा ठरणार आहे. त्या सर्वांचा एकत्रित विचार करूनच सरकारला धोरण ठरवावे लागेल. याबाबत सरकार लवकरच एखादे अधिकृत धोरण जाहीर करून विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील संभ्रम संपवण्याचे काम करेल, अशी आशा करूया. गेले वर्षभर दहावीच्या परीक्षेचा तणाव घेऊन त्या वातावरणातही अभ्यास करून चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या आणि दहावीचा हा महत्त्वाचा टप्पा पार करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या आगामी कारकिर्दीसाठी शुभेच्छा!