पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेचा निकाल हा सर्वाधिक 98.30 टक्के तर सर्वात कमी व्यवसाय अभ्याक्रमाचा निकाल 66.41 टक्के लागला आहे.
राज्य मंडळाच्या वतीने दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. यंदा निकाल पाहण्यासाठी सात वेबसाइट उपलब्ध करुन देण्यात आल्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना सुरळीतपणे निकाल पाहता आला.
निकाल पाहण्यासाठी मोबाइल, संगणक, लॅपटापचा वापर करण्यात आला. काही जणांनी सायबर कॅफेकडे धाव घेतली. निकाल जाहीर होतात विद्यार्थी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जल्लोष करण्यासाठी जमा झाले होते. पेढे वाटून आंनदोत्सव साजरा करण्यात आला.
विज्ञान शाखेत नागपूर विभागाचा सर्वाधिक 99.31 टक्के तर सर्वात कमी पुणे विभागाचा 97.27 टक्के निकाल लागला आहे. कला शाखेतही कोकण विभागाचा सर्वाधिक 94.37 टक्के तर सर्वात कमी मुंबई विभागाचा 84.89 टक्के निकाल लागला आहे. वाणिज्य शाखेत कोकण विभागाचा सर्वाधिक 97.47 टक्के तर सर्वांत कमी मुंबई विभागाचा 89.49 टक्के एवढा निकाल लागला आहे. व्यवसाय अभ्यासक्रमात कोकण विभागाचा सर्वाधिक 98.08 टक्के तर सर्वात कमी पुणे विभागाचा 90 टक्के निकाल लागला आहे.
राज्यात 21 महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. लागलेल्या शाखा आढळून आलेल्या आहेत. यात विज्ञानच्या 8, कलाच्या 7, वाणिज्यच्या 6 महाविद्यालयांचा समावेश आहे. या परीक्षेत राज्यात एकूण 242 कॉपीची प्रकरणे आढळून आली आहेत. यात 5 डमी विद्यार्थी परीक्षेला आढळून आलेत. 158 विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत.
17 जूनला मिळणार गुणपत्रिका
ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात कनिष्ठ महाविद्यालयात 17 जून रोजी दुपारी 3 वाजता गुणपत्रिका वाटप करण्यात येणार आहेत.
दिव्यांगांचा 95.24 टक्के निकाल
बारावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल हा 95.24 टक्के लागला आहे. या परीक्षेसाठी राज्यातून 6 हजार 333 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात 4 हजार 114 मुले तर 2 हजार 219 मुलींचा समावेश होता. प्रत्यक्षात 4 हजार 92 मुले व 2 हजार 2009 मुली असे एकूण 6 हजार 301 दिव्यांग परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. यात 6 हजार 1 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात 3 हजार 988 मुले तर 2 हजार 124 मुलींचा समावेश आहे. मुलांचा निकाल 94.75 टक्के तर मुलींचा निकाल 96.15 टक्के लागला आहे.