मुंबई – मार्च 2022 पर्यंत तरी रिझर्व्ह बॅंक उदार पतधोरण चालू ठेवण्याची शक्यता असल्याचे रिझर्व्ह बॅंकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा गेल्या दीड वर्षांमध्ये मोठा घसारा झाला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये उद्योग आणि नागरिकांना ताकतीने वाटचाल करण्यासाठी भांडवल सुलभतेची गरज आहे. याची जाणीव रिझर्व्ह बॅंकेला आहे. जास्तीत जास्त वेगामध्ये विकासदर पूर्वपदावर यावा असे रिझर्व्ह बॅंकेला वाटत असल्यामुळे उदार पतधोरण राबविण्यात आले आहे.
या परिस्थितीमध्ये मार्च 2022 पर्यंत फारसा फरक पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. रिझर्व्ह बॅंकेचे महासंचालक मायकेल पात्रा यांनीही बॅंक पतधोरणात अचानक मोठा बदल करणार नसल्याचे गेल्याच आठवड्यात सांगितले होते. विकास दर वाढत असला तरी महागाई जास्त असल्यामुळे रिझर्व्ह बॅंक व्याजदर वाढीचा निर्णय घेईल अशी चर्चा चालू असतानाच गांधी यांनी हे वक्तव्य केले आहे.
गेल्या अनेक तिमाहीत रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर कमी पातळीवर ठेवले आहेत. त्याचबरोबर सरकारी रोखे खरेदीच्या माध्यमातून भांडवल सुलभता मुबलक ठेवली आहे. या धोरणामध्ये नजीकच्या भविष्यात फारसा बदल केला जाणार नसल्याचे त्यांना वाटते.
विकास दर व कर संकलन वाढत असले तरी अर्थव्यवस्था खात्रीने पूर्वपदावर आली आहे असे वाटत नाही. त्यामुळे रिझर्व्ह बॅंक निर्णय घेताना कसलीही गडबड करणार नाही असे त्यांनी सांगितले. भारतीय बॅंकिंग व्यवस्था मजबूत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या क्षेत्रामध्ये बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. अनुत्पादक मालमत्ता वेगाने कमी होत आहे. त्यामुळे कर्ज वितरणाची बॅंकांची क्षमता वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.