कर्ज होणार आणखी स्वस्त !
मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने सलग पाचव्यांदा व्याज दरात कपात केली आहे. त्यामुळे बॅंकांमधून मिळणारे कर्ज आणखी स्वस्त होणार आहे. हा या दशकातील सर्वात कमी व्याज दर आहे. देशाचा विकास दर सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेला असल्याने त्याला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने सरकारच्या धोरणाला अनुकुल असा निर्णय घेतला आहे.
रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणाशी संबंधीत समितीच्या सर्व सहाही सदस्यांनी हा निर्णय एकमताने घेतला आहे. त्यानुसार व्याज दरात 25 बेसिक पैसे इतकी कपात करण्यात आली असून त्यामुळे रेपोरेट हा 5.15 टक्के इतका झाला आहे. या आधीचा किमान रेपोरेट 5 टक्के इतका होता. मार्च 2010 मध्ये तो करण्यात आला होता.
रिव्हर्स रेपोरेटचा दर 4.9 टक्के इतका करण्यात आला आहे. रिझर्व्ह बॅंकेने चालू अर्थिक वर्षातील जीडीपीचा दर 6.9 टक्के इतका राहील असा अंदाज या आधी वर्तवला होता तो आता त्यांनी आणखी कमी केला असून यंदाचा जीडीपी केवळ 6.1 टक्के इतकाच राहील असा सुधारीत अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
व्याजदर कपातीच्या निर्णयामागचे कारण स्पष्ट करताना बॅंकेने म्हटले आहे की चालू सणासुदीच्या काळात ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी व्हावी आणि त्यातून आर्थिक चलनवलन वाढावे या हेतूने ही कपात करण्यात आली आहे. गृह आणि वाहन खरेदीसाठीच्या कर्जांचे व्याज कमी झाले तर त्या व्यवसायांमधील खरेदी वाढेल आणि त्यातून या क्षेत्रांना चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चलनवाढीचा दर नियंत्रणात राहिल्याने विकासाला वाव देण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला असल्याची माहिती गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली.
जो पर्यंत विकास दराच्या वाढीला चालना मिळत नाही तो पर्यंत आम्ही सोशिक अशीच भूमिका घेणार आहोत असेही त्यांनी यावेळी नमूद केले. आरबीआयने या आधीच्या एकूण चार कपातीत मिळून 110 बेसिक पैसे इतकी कपात केली आहे.
सरकारने वित्तीय तुट 3.3 टक्के इतक्या पातळीवर कायम राखली जाईल असा निर्धार व्यक्त केला आहे. त्यात सरकार यशस्वी होईल असा विश्वासही दास यांनी व्यक्त केला. सरकारने अलिकडेच उद्योग क्षेत्राला दिलेल्या करसवलतींमुळे खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढीला चालना मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.