पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महासभेत शेतकरी आंदोलनाचे पडसाद उमटले. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सभा तहकूब करण्याची मागणी यावेळी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केली. परंतु महापौरांनी ती अमान्य करत कामकाजास सुरुवात केली. परंतु वाढत्या गोंधळात अवघ्या तीन मिनिटांमध्ये महासभा उरकावी लागली.
मंगळवारी भारत बंद पुकारण्यात आला होता. याचे पडसाद महापालिकेच्या महासभेतही उमटले. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादीच्या नगरसेविका वैशाली काळभोर, प्रज्ञा खानोलकर, नगरसेवक राजू बनसोडे, माजी महापौर मंगला कदम आदी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्त काळा पोषाख परिधान करून सभागृहात प्रवेश केला. यावेळी मिसाळ म्हणाले की, केंद्र सरकारने केलेले कायदे शेतकरी व कामगारांना मान्य नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर आज भारत बंदची घोषणा केली आहे. त्यामुळे आपण देखील सर्वसाधारण सभा तहकूब ठेवणे योग्य ठरेल. तरी, आजची सभा तहकूब करण्यात यावी, अशी मागणी महापौर माई ढोरे यांच्याकडे केली. मात्र पक्षनेते नामदेव ढाके यांनी शेतकऱ्यांप्रती आमच्या भावना आहेत, पण सभा तहकूब न करता ती पूर्ण करून घ्यावी अशी मागणी केली. त्यामुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका मंगला कदम यांनी सभा तहकूब करायची की घ्यायची यावर मतदान घेण्याची मागणी केली. नगरसेवक भाऊसाहेब भोईर म्हणाले, कृषी कायद्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. त्या त्रुटींना शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. त्यांच्या भावनेचा विचार करत त्या कायद्यामधील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. आज लाखो शेतकरी कडाक्याच्या थंडीमध्ये रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्याकडे पाहून एक माणुसकीच्या नात्याने आजची सभा तहकूब करून ती उद्या घ्यावी.
महासभेमध्ये राष्टवादी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभा तहकूब करण्याचा आग्रह धरला. मात्र महापौरांनी सभा तहकूब करायची होती तर सभेच्या पूर्वी कल्पना द्यायला हवी होती, असे सांगत सभा कामकाजाला सुरूवात केली. सभा कामकाजाला सुरूवात करताच विरोधी पक्षातील नगरसेवकांनी घोषणा देत डेस्ककडे धाव घेतली. त्या गोंधळातच अवघ्या तीन मिनिटामध्ये महापौरांनी महासभा उरकली.