मुंबई : बालमोहन विद्यामंदिरतर्फे आयोजित बालमोहन अभिमान सोहळ्यात 1976-77 च्या बॅचचे विद्यार्थी असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
बालमोहन विद्यामंदिरचे दादासाहेब रेगे अर्थात दादांच्या संस्कारात माझ्यासह अनेक विद्यार्थी घडले. शाळा म्हणजे नुसत्या भिंती नाहीत, तर विचार आणि संस्कारांची शिदोरी असल्याचवे मुख्यमंत्री म्हणाले. या शाळेने दाखविलेल्या मार्गावरुन आम्ही पुढे जात आहोत अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. पालक आणि मुलांमधील नाते शब्दांपलीकडचे. माझ्या पालकांनी मला घडवले तर बालमोहन विद्यामंदिर सारख्या शाळेने संस्कार दिले. आज माझे पालक माझ्यासोबत नसले तरी प्रत्येक पावलावर त्यांची आठवण येते, असे भावनिक उद्गार उद्धव ठाकरे याने काढले.
बालमोहनच्या विद्यार्थ्यांच्या जीवनाचा दादासाहेब रेगे हा अविभाज्य घटक आहे. दादांमुळे चांगले विचार करण्याची, वाचन करण्याची सवय लागली. त्यांच्या संस्कारांमुळे चांगले-वाईट यामध्ये फरक करता आला. त्यामुळे आम्ही बालमोहनचे विद्यार्थी कधीही चूक करणार नाही असा विश्वास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, अभिनेते अतुल परचुरे, अजित भुरे, गुरुप्रसाद रेगे आदी उपस्थित होते.