शेतकऱ्याच्या जीवनातील एक अतिशय महत्त्वाचा आणि अनन्यसाधारण असा घटक म्हणजे बैल. या दोघांचं नातं खरं तर शब्दात व्यक्त करणं शक्यच नाही. बैल हा प्रत्येक शेतकऱ्याच्या दृष्टीने त्याचा सखा, सोबतीच, बैलाचा वापर शेतीसाठी जरी मोठ्या प्रमाणात होत असला तरी आपल्याकडे शेतीच्या कामाव्यतिरिक्त आपली परंपरा जपण्यासाठी तसेच शेतकरी आणि बैलाचे असणारे नाते आणखी घट्ट करण्यासाठी बैलगाडी शर्यतीचे आयोजित केले जाते. परंतु, या बैलगाडी शर्यती कायद्याच्या कचाट्यात सापडल्याने त्यांच्यावर बंदी आली होती.
शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला. त्याला यश आले असून आता बैलगाडी शर्यत पुन्हा एकदा सुरू झाली. ग्रामीण भागात विविध प्रकारच्या शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी कित्येक वर्षांपासून बैलगाडीने महत्त्वाची भूमिका बजावली. आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत महाराष्ट्रात बैलपोळा हा सर्जा-राजाचा सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांचे आभार मानण्यासाठी साजरा केला जातो. त्यानंतर आता राज्यस्तरीय बैलगाडी शर्यत आयोजित करून शेतकऱ्यांसाठी प्रतिष्ठेची आणि सन्मानाची समजली जाणारी अशी ही परंपरा जोपासण्यासाठी आम्ही एक पाऊल टाकले आहे.
बैलगाडी शर्यत प्रेमींच्या भावना लक्षात घेऊन कर्जत शहरात पहिली राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत आयोजित केली आहे. महाराष्ट्रासह गुजरात, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक आदी राज्यांमध्येही बैलांच्या धावण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्याला त्या- त्या राज्यांनुसार वेगळी नावेही दिले आहेत.
शर्यतीला जेव्हा न्यायालयाने हिरवा कंदील दिला तेव्हाच ठरवले की आपल्या मतदारसंघात यंदा भिर्ररर झालेच पाहिजे! राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आता राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत आयोजित करण्यामागे खरं तर अनेक पैलू आहेत. त्यापैकी एक सांगायचं झालं तर ग्रामीण भागातील अर्थकारण या शर्यतीचे आयोजन झाल्याने परंपरेचे जतन आणि संवर्धन तर होईलच शिवाय मतदारसंघातील विविध स्तरातील लोकांना या माध्यमातून आर्थिक फायदा होईल.
बैलाचे सजविण्याचे साहित्य विकणाऱ्यापासून ते शर्यत आयोजित केलेल्या ठिकाणी छोटे व्यवसाय करणारे व्यावसायिकांना आणि अशा सर्वांनाच या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फायदा अशा स्पर्धांमुळे होत असतो. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विविध भागातून लोक या स्पर्धेसाठी कर्जत शहरात येतील आणि या स्पर्धेचा प्रचार आणि प्रसार राज्य पातळीवर होईल. अशा स्पर्धा आयोजित केल्यामुळे शेतकरी आणि बैलाचे तेच नाते आणखी घट्ट होईल आणि त्याला एक नवे वळण मिळेल हा एक आणखी महत्त्वाचा हेतू ही स्पर्धा आयोजित करण्यामागे आहे.
– आमदार रोहित पवार