सातारा -महाबळेश्वरच्या तहसीलदारांच्या खासगी गाडीवरचा लाल दिवा माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर वाहतूक विभागाकडून उतरविण्यात आला. या कारवाईमुळे बैठकीसाठी तेथे आलेल्या अनेक तहसीलदारांच्या लाल दिव्याच्या गाड्या तिथून तातडीने गायब झाल्या. या अचानक कारवाईची घटनास्थळावर जोरदार चर्चा झाली.
शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या गाडीवर लाल दिवा लावणे आता प्रतिबंधित करण्यात आले आहे. केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 च्या नियम 119 तीन प्रमाणे वाहन विभाग पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या, सेनादलाची वाहने यांना कर्तव्य बजावताना सायरन आणि दिव्यांचा वापर करण्यासाठी परवानगी होती.
मात्र, त्यामध्ये सुधारणा करण्यात येऊन शासकीय वाहनांवरील हा अपवाद वगळता अंबर आणि लाल दिवे हटविण्यात आले आहेत. असे असताना महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी पाटील सोमवारी एका बैठकीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आल्या होत्या. त्यांनी आणलेले वाहन खासगी होते. त्या वाहनावर अंबर दिवा लावण्यात आला होता. ही गोष्ट लक्षात आल्यावर माहिती अधिकारातील सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांच्याकडे त्याची तक्रार केली.
वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन महाबळेश्वर तहसीलदारांच्या गाडीवरचा अंबर दिवा उतरवला. या प्रकरणाची माहिती घेतली असता महाबळेश्वर तहसीलदारांचे शासकीय वाहन अत्यंत खराब अवस्थेत असून काही दिवसांपूर्वी डोंगरी भागात दौऱ्यावर जात असताना शासकीय वाहनाच्या अपघातातून त्या थोडक्यात बचावल्या.
जिल्हा प्रशासनाकडे मागणी करूनही त्यांना दुसरे शासकीय वाहन मिळाले नाही. त्यामुळे त्या खासगी वाहनाने सातारा येथे आल्या. मात्र, खासगी वाहनावर अंबर दिवा अथवा या वाहनांच्या संदर्भातील महसूल विभागाशी करार वगैरे अशा कोणत्याही तांत्रिक गोष्टीची पूर्तता त्यांनी केली नाही. तसेच वाहन चालक त्यांच्या कार्यालयातील स्वीपर असल्याचे स्पष्ट झाले आहे. मूळ चालक पदावरील कर्मचारी कार्यालयात बसवून ठेवण्यात आले आहे.