ओंकार दळवी
अनेक बसगाड्या मोडकळी
जामखेड – जामखेड आगारातील परिवहन महामंडळाच्या अनेक बस गाड्यामध्ये प्राथमिक स्तरावरील सोयी सुविधा अभाव आहे. बहुतांश बसमध्ये प्रथमोपचार पेट्या, अग्निरोधक सिलिंडर गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे.प्रवाशांच्या सुखकर प्रवासाची हमी देणाऱ्या महामंडळाच्या अनेक बस मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे लालपरीचा प्रवास आता धोकादायक झाल्याचे चित्र आहे.
जामखेड मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. शहरातील स्थानकातून दररोज मुंबई, पुणे, नाशिक, शिर्डी, तुळजापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, कळंब, गाड्या धावतात खासगी वाहतुकदारांची संख्या वाढल्यामुळे “लोकवाहिनी’ समजल्या जाणाऱ्या एसटीकडे सर्वाधिक नागरिकांचा ओढा असलेला आता तो कमी झाला. त्यामुळे एसटीकडे प्रवाशांची संख्या अलीकडच्या काळात घटत चालली आहे.
प्रवाशांना पुन्हा एसटीकडे ओढण्यासाठी उपक्रम राबवले जात आहेत. यासाठी प्रवासी वाढवा अभियानाबरोबरच उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. एसटी बसचा अपघात झाल्यास प्रवाशांना तातडीने मदत, प्राथमिक उपचार मिळावेत यासाठी परिवहन विभागाच्या नियमानुसार बसमध्ये सर्व अत्यावश्यक गोष्टींसह प्रथमोपचार पेटी ठेवणे बंधनकारक आहे.
अचानक बसमध्ये आग लागल्यास बचावासाठी अग्निरोधक सिलिंडर असणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महामंडळाकडून प्रत्येक वर्षी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक तरतूदही केली जाते. मात्र, नेमका निधी कुठे खर्च होतो हेच कळत नाही.
आगाराकडून प्रवाशांना नेहमीच वेठीस धरले जात आहे. ग्रामीण भागातील मार्गावर फेऱ्या करणाऱ्या अनेक बसेस खिळखिळ्या झाल्या असून त्यात तुटलेल्या खिडक्या, आसन व्यवस्थेवरील स्पंज गायब, चालक, वाहकाजवळील दरवाजाची दयनीय अवस्था, इंजिन समोरील बहुतांश भाग खिळखिळा झालेल्या नादुरुस्त बसेसचा वापर करणे धोकादायक आहे.
यामुळे तातडीने यासंदर्भात योग्य पद्धतीने नियोजन करण्याची गरज आहे. आगारप्रमुख व कर्मचारी प्रवासी दिवसाचे औचित्य साधून गुलाब पुष्प देवून स्वागत करतात. रस्ता सुरक्षा मोहिमेत चालकांचा सत्कार होतो, मात्र खिळखिळ्या बसमधून प्रवास करताना जीव धोक्यात घालून प्रवाश्यांना प्रवास करावा लागतो. या आगारातील जवळपास निम्म्याहून अधिक गाड्यांची दुरावस्था झाल्याने चालक, वाहक व प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
वर्कशॉपमध्ये कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने बहुतांशी गाड्या वेळच्या वेळी दुरुस्त करणेही दुरापास्त बनल्याचे चित्र आहे. यासाठी ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसमध्ये सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी होत आहे.
कालबाह्य बस बंद करण्याची मागणी
खिळखिळ्या बस वापरणे चुकीचे असताना ग्रामीण भागात नादुरुस्त बसेस पाठवण्यात येतात. गाड्या केव्हा व कोठे बंद पडतील याचा नेम नाही. सहा महिन्यापूर्वी धावत्या बसचे टायर निघून पडले. सुदैवाने जीवित हानी टळली होती. यामुळे कालबाह्य झालेल्या बस तातडीने बंद करून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.
आरटीओंचे दुर्लक्ष
आरटीओ विभागास एसटी महामंडळाच्या बसेस दिसत नाही का? जामखेड आगारातील ग्रामीण भागात जाणाऱ्या बस मोडकळीस आल्या असून सकाळी रस्त्याने काळाकुट्ट् धूर, खडखडाट गाड्या धावत असताना प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. अन्य वाहनांची तपासणी करून दंड आकारणी होते, मात्र बहुतांश बसेस कालबाह्य झाल्या असताना प्रादेशिक परिवहन विभागास दिसत नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.