नवी दिल्ली – जागतिक क्रीडा क्षेत्रालाही आता आर्थिक फटका बसणार आहे. करोनामुळे देशातील क्रिकेटसह सर्वच क्रीडा स्पर्धा एकतर रद्द झाल्या आहेत. किंवा काही स्पर्धा लांबणीवर पडलेल्या आहेत. अशा स्थितीत दरवर्षी विविध क्रीडा प्रकारांना प्रायोजकत्व करत असलेल्या कार्पोरेट तसेच व्यवसायिक समूहांनी यंदा आपली प्रायोजकत्वाची तसेच करारातील रक्कम रोखली आहे. त्यामुळे स्पर्धाच होत नसल्याने संकटात सापडलेल्या क्रीडा संघटनांना आता आणखीनच नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे.
केवळ खासगी प्रायोजकच नव्हे तर विविध क्रीडा संघटनांना सरकारचे अनुदान मिळते त्यातही आता मोठी कपात केली जाणार आहे. करोनामुळे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात मंदी आल्याने या संघटनांना निधीच उपलब्ध होणार नसल्याचे संकेत काही समूहांनी दिले आहेत. स्पर्धाच होत नाहीत तर मग प्रायोजकत्वची रक्कम कशी देणार, अशी विचारणा या समूहांनी केली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही एक स्वायत्त संस्था आहे. मात्र, ती वगळता अन्य क्रीडा संघटना केंद्रीय तसेच राज्य क्रीडा मंत्रालयांच्या निधीवरच अवलंबून असतात. खासगी प्रायोजक असतात मात्र, क्रिकेटप्रमाणे त्यांचे करोडो रुपयांचे करार नसतात. एखाद्या स्पर्धेला किंवा एखाद्या अव्वल खेळाडूलाच वैयक्तिक प्रायोजकत्व मिळालेले असते. त्यातही आता बदल होणार असून जोवर स्पर्धा व्यवस्थित सुरू होत नाहीत तोपर्यंत कोणताही प्रायोजक निधी देणार नाही हे स्पष्ट झाले आहे. क्रिकेट वगळता बाकी क्रीडा संघटनांना क्रीडा मंत्रालयाकडून आर्थिक पाठबळ मिळते. केंद्र सरकारच्या वार्षिक अंदाजपत्रकात यंदा खूप वाढ करण्यात आलेली नाही.