मुंबई – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांचे आत्मचरित्र पुढील काही दिवसांत देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे. राज्यसभेचे खासदार असलेल्या नारायण राणे यांनी, आपल्या या आत्मचरित्रात शिवसेना पक्ष कोणत्या कारणामुळे सोडला याचा उलगडा केला असल्याचे म्हंटले आहे.
नारायण राणे यांनी आपल्या या आत्मचरित्रात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी वैयक्तिक मतभेद नसल्याचे सांगत, राजकीय घडामोडींबद्दल अनेक गुपितांवर भाष्य केले असल्याचे म्हंटले आहे. तसेच आपल्या आत्मचरित्रात शिवसेना, काँग्रेस आणि भाजपा या पक्षांमधल्या प्रवासाबाबत उल्लेख केला असल्याचे म्हंटले आहे.
शिवसेनेत असताना नारायण राणे १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९ दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर २००५ मध्ये शिवसेनेला सोडचिट्ठी देत त्यांनी काँग्रेसचा रस्ता पकडला. तर २०१७ मध्ये काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या नव्या पक्षाची स्थापना केली.