मुंबई – मुंबई – शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यादरम्यान भेट झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. या भेटीच्या वृत्तानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालांनंतर दुरावलेले शिवसेना – भाजप पक्ष पुन्हा जवळीक साधू इच्छितायेत काय? राज्यातील राजकीय गणित पुन्हा बदलणार काय? अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये चर्चिल्या जाऊ लागल्या होत्या. मात्र महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या भेटीमागच्या कारणाचा उलगडा या चर्चांना तूर्तास पूर्णविराम दिला.
उपाध्ये यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून भेटीमागचा उद्देश सांगताना, “माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली आहे. संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही.” असं स्पष्ट केलं.
तत्पूर्वी, संजय राऊत व देवेंद्र फडणवीस यांच्यादरम्यान झालेल्या भेटीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, ‘अशा भेटी होत राहतात’ अशी प्रतिक्रिया दिली होती.