नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यात आज दिल्ली बैठक झाली. शरद पवारांनी मोदींची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, असाही तर्क लावण्यात येत होता. त्यामुळे या भेटीने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे.
दिल्लीत झालेल्या या भेटीचं खरं कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं. शरद पवार आणि मोदी यांच्या भेटीचं मुख्य कारण सहकार क्षेत्रातील परिस्थिती असल्याचं त्यांनी म्हटलं.
देशाच्या अनेक भागातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील लोकांनी शरद पवार यांना मागील महिन्या-दीड महिन्यात अनेक पत्र पाठवली. त्या सगळ्यांचा विचार करून केंद्र सरकारने यात लक्ष घातले पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत, यासाठी शरद पवार मोदींना भेटायला गेले, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.
दोन दिवसांपूर्वीच शरद पवार, ऐ.के. अँटनी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या चर्चा झाली होती. त्यामुळे सुरक्षेसंबंधित विषयावर पवार-मोदी भेट असू शकते, असंही पाटील यांनी नमूद केलं.