नवी दिल्ली – कोविड-19 विरोधी प्रयत्नांचा भाग म्हणून, केंद्र सरकारने चाचण्यांमध्ये वाढ केली असून, केंद्र सरकारने राज्यांनाही चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी मदत केली आहे. त्यामुळे देशातील रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर आता कमी झाला आहे. राष्ट्रीय स्तरावर हा सरासरी दर आता 6.73टक्के इतका आहे.
दिल्लीत, केंद्रशासित सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना केंद्र सरकारने मोठे पाठबळ दिले आणि चाचण्यांच्या संख्येत वाढ होईल, याकडे लक्ष दिले. आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढवली गेली, त्यासोबतच, नव्या रॅपिड अँटिजेन पॉईंट ऑफ केअर चाचण्याही सुरू करण्यात आल्या. या चाचण्यांचा रिपोर्ट केवळ 30 मिनिटात कळू शकतो.
केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमुळे, आधी दिल्लीत ज्या दररोज केवळ 5,481 चाचण्या केल्या जात होत्या, त्यांच्यात नंतर लक्षणीय वाढ होऊन, आता एक महिन्यानंतर, म्हणजेच 1 ते 5 जुलै या दरम्यान दररोज सरासरी 18,766 चाचण्या केल्या जात आहेत. दिल्लीतील रुग्ण पॉझिटिव्ह निघण्याचा दर कमी झाला असून गेल्या तीन आठवड्यात हा दर 30 टक्क्यांवरुन 10 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.