मुंबई – दुष्काळी स्थिती मुळे राज्यातील सन 2018-19 या आर्थिक वर्षातील कृषी उत्पादनाचे प्रमाण आठ टक्क्यांनी घटेल असा अंदाज आर्थिक पहाणी सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. कृषी क्षेत्राचा विकास दर गेल्या वर्षी 3.1 टक्के इतका होता तो आता 0.4 टक्क्यांवर आला आहे असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.
दरम्यान असे असले तरी राज्याच्या एकूण विकास दरावर मात्र याचा काही विपरीत परिणाम होणार नाहीं. कारण या काळातील राज्याचा एकूण विकास दर गेल्या वर्षी इतकाच म्हणजे 7.5 टक्के इतका राहील असे या अहवालात म्हटले आहे.
राज्यातील औद्योगिक विकास दरातही घट दिसून येत असून यंदाचा औद्योगिक विकासाचा दर 7.6 टक्क्यांवरून 6.9 टक्के इतका खाली येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तथापी सेवा क्षेत्रातील विकास दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत किंचीत वाढ होऊन तो 8.1 टक्क्यांवरून 9.2 टक्के इतका होईल. दरम्यान राज्यातील दरडोई उत्पन्न 1 लाख 91 हजार 827 इतके राहील असे यात सांगण्यात आले आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत राज्याचा देशात तिसरा क्रमांक लागतो. याबाबतीत कर्नाटक आणि आंधप्रदेश ही राज्ये महाराष्ट्रापेक्षा आघाडीवर आहेत.