मागील आठवड्यात तब्बल सात वर्षांनी चार बलात्काऱ्यांना दिल्लीतील तिहार कारागृहात फाशी देण्यात आली. युक्त्यांवर युक्त्या लढवत त्या चारही जणांनी कोर्टाकडे वारंवार दयेची मागणीही केली, पण ती फेटाळत कोर्टाने त्यांना फाशी घोषित केली. 20 मार्च 2020 रोजी या नराधमांना फाशी देण्यात आली, निर्भयाच्या आईने तो दिवस प्रत्येक स्त्रीसाठी समर्पित केला. जरी सध्या कोरोनाच्या सावटामुळे इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होत असले तरी हा समाज खळबळून जागा करणाऱ्या या फाशीचे सर्वांनी कौतूक केले.
आता राहिला प्रश्न, की या फाशीमुळे देशातील बलात्कार संपतील का ? क्रुर प्रवृत्ती असणाऱ्या या लोकांना कायद्याचा वचक बसेल का ? भारत हा लोकशाहीसत्ताक देश आहे, आणि इथे नागरिकांना फक्त कायद्याची भिती असते, पण ती या नवीन पिढीला राहिली आहे का, या सर्व प्रश्नांचे उत्तर हेच येते की बलात्कार करणाऱ्याला फाशी दिली जाते, त्याला संपवले जाते, पण त्याने केलेली विकृती तिथेच थांबत नाही तर त्यातून नविन विकृती जन्म घेते. आणि मानवजात ही जेवढी बुध्दिवान जात मानली जाते तेवढाच तिच्यामध्ये क्रुरपणा आहे.
फक्त फाशी हे बलात्कार थांबवण्याचे साधन नाही, असे मला वाटते. कारण जी व्यक्ती वाईट कृती करते तेव्हा ती या गोष्टीने जाणकार असते की तिला आज ना उद्या फाशी होणार पण तरीही स्वतःच्या जीवावर बेतून ती समोरच्या व्यक्तीवर अमानुष अत्याचार करते, आणि नंतर ते मान्यही करत नाही. या सर्व गोष्टीला जबाबदार असते ते म्हणजे सामाजिकरण. ज्या समाजात तो बलात्कारी वाढलेला असतो त्यातूनच या वाईट प्रवृत्ती शिकलेला असतो. भारत हा ज्याप्रकारे कृषीप्रधान देश मानला जातो त्याप्रकारे इथली कुटुंबपध्दती ही पुरूषप्रधान आहे, आणि त्यामुळे घरात जास्त सत्ता ही पुरूषाची असते. पुरूष हाच आपला वारसा पुढं नेणार आहे आणि त्याला जपणे हे प्रत्येक घराचं पहिलं कर्तव्य असतं, पण आपलं हे चुकतं की तो पुर्वजांची चांगली शिकवण पुढं नेत आहे की, त्याच्या वाईट प्रवृत्तीला जन्माला घालत आहे, हे वेळीच न समजणं. पुरूष नेहमी स्वतःला घरात सत्ताधारक समजत असतात, प्रत्येक पुरूष हा स्त्रीकडे एक प्रकारचे उपभोग साधन म्हणून पाहत असतो आणि त्याला जेव्हा ते उपभोगायला मिळत नाही तेव्हा तो एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे निर्भयासारख्या निष्पाप जीवांचा घात करतो.
आपल्या भारतात लैगिंक शिक्षण हे गुपीत ठेवून घेतलं जाणारं शिक्षण मानलं जातं, ते असं चार चौघात बसून, घरात गप्पा मारत आत्मसात नाही करता येत. आणि तसं केलं तर ते पाप समजलं जातं, त्यामुळे ज्या वयात मुलाला या गुपीताबाबत कळायला लागतं तेव्हा खरी विकृती घडायला सुरूवात होते. जी अशा गंभीर घटनांमुळे उघड होते. जर समाजात लैगिकतेबद्दल समज असेल, त्यामध्ये उघडपणा असेल तर असे क्रुर प्रकार थांबवण सोपे होईल. आपण काय करत आहोत, आपण काय चूक केली आहे हे जो मान्य करू शकत नाही तो खरा अपराधी असतो. आणि जसं जग पुढं चाललं आहे त्याप्रमाणे ही वाईट वृत्ती वाढत चालली.
सध्याच्या घडीला टिव्ही, मोबाईल ही अशी साधनं ज्यांचा ह्या विकृतीशी बारिक पण महत्त्वाचा संबध येतो. मी माझ्याच मनाने केलेले एक संशोधन म्हणजे, आजच्या प्रत्येक मुलाला तुझा आवडता हिरो कोण असं विचारलं तर त्याच्या तोंडात येतं- संजय दत्त, अजय देवगण आणि असे अनेक जे चित्रपटात हिरोच असतात पण त्यांचा व्यवसाय हा गुंडगिरीचा असतो, ज्यामध्ये जास्त प्रमाणात धुम्रपान, मारामारी, खून आणि जास्तीत जास्त म्हणजे कारगृहात काढलेलं जीवन दाखवलं जातं. आणि त्यामुळे आज कोणत्याच गुन्हेगाराला जेलची भिती राहिली नाही, जेल हे आमच्यासाठीच बांधलेले असतात, अशाप्रकारे ह्या घाण विकृतीमागे हा स्वाभिमानही लपलेला असतो, आणि तिथे माणुसकी संपून क्रुर गोष्टींचे व्यसन वाढलेले असते, त्यामुळे समाज माध्यमांवरील प्रत्येक चित्रपटाने आपण काय दाखवत आहोत, आणि त्याचा ह्या सामाजिकरणावर कोणत्याप्रकारे परिणाम होणार आहे याचा चारही बाजूने विचार करणं आजतरी अत्यावश्यक आहे.
मला वाटते, प्रत्येक घरात आता लैंगिकतेबद्दल खुले संभाषण व्हायला हवं. यामध्ये प्रथमतः स्त्री आणि पुरूष यांमध्ये कशाप्रकारे वेगळेपण असते हे दाखवण्यापेक्षा स्त्री आणि पुरूष हे दोघेही माणूस आहे आणि दोघांच्या गरजाही एकच आहेत. कदाचित ते मूल लवकरच या गोष्टी समजून घ्यायला सुरूवात करेल, पण ते समजून घ्यायचा मार्ग हा कोणताही वाईट मार्ग नसून तुम्ही असाल. ज्याप्रमाणे प्रत्येकाला सर्व प्राथमिक अधिकार आहेत तसेच त्याला योग्य शरीरसुख मिळवणेदेखील एक अधिकार आहे पण त्यातील नैसर्गिकता या पिढीतील प्रत्येक उमलत्या मुलांना समजावून देणं आवश्यक आहे. अट्टल गुन्हेगाराला आपण बदलू शकत नाही, पण जे आजचं बीज उद्याचा प्रज्ज्वल भारत घडवणार आहे त्याला त्याच्या सर्व सुप्त इच्छा व्यक्त करता आल्या पाहिजे, आणि त्यामध्ये सामाजिकरण हा पहिला घटक येतो.
आई- वडिल, शिक्षक, परिसरातील लोकं, ही सर्व लहान मुलाला ज्ञान मिळण्याचे मार्ग असतात आणि या मार्गानेच त्याला अशा गोष्टी कळाल्या पाहिजे त्या त्याला एकट्याला शोधण्याची गरज पडणार नाही.
त्यामुळे मारेकऱ्याला फाशी देऊन गुन्हा संपत नाही, समाजाची रचना आता बदलणे गरजेचे आहे. कोणतीही काठी ही जेव्हा कोवळी तेव्हा ती वाकू शकते, पण तिचे लाकूड झाल्यावर ती वाकवणे सोप्प नसते, तेव्हा तिला तोडावेच लागते. त्यामुळे प्रत्येक घरात जर चोरी, खून, बलात्कार या विषयावर लहानपणापासून खुले संभाषण झाले तर, केवळ तरूण मुलांसाठी चालणारे कितीतरी अवैध व्यवसाय बंद होतील, आणि निर्भयासारखं कुणाला मरण येणार नाही, ना या चार विकृत लोकांसारखी कुणाला फाशी होईल.
– भारती उबाळे,
कॉलेज रिपोर्टर,
आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे