मुंबई – महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी उकळण्याचे खोटे आरोप करण्यात आले असून प्रत्यक्षात सचिन वाझे हेच परमवीरसिंह यांच्यासाठी मुंबईतील व्यावसायिकांकडून खंडणी वसुल करीत होते असा आरोप मुंबईतील विमल आगरवाल नावाच्या बांधकाम व्यावसायिकाने चौकशी आयोगापुढे एका प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. आगरवाल यांनी या संबंधात आपले म्हणणे 26 पानी प्रतिज्ञापत्रासह चौकशी आयोगापुढे सादर केले आहे.
सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात केलेल्या दाव्याच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने हा चौकशी आयोग स्थापन केला आहे. या प्रतिज्ञापत्रात सचिन वाझे परमवीरसिंह यांच्यासाठी कशा प्रकारे खंडणी वसुली करीत होता याचा सारा तपशील कथन केला आहे.
परमवीरसिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहुन अनिल देशमुखांच्या संबंधात जो आरोप केला आहे तो साफ खोटा असून आयोगाने परमवीरसिंह यांचे हे पत्रच रद्द करावे आणि परमवीरसिंह यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या आयोगाची पुढील सुनावणी 30 ऑगस्ट रोजी होंणार आहे.