मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सत्र न्यायालयाने जामीन देताना दिलेल्या अटींचा भंग झाला नसल्याचा दावा करत आज कोर्टान्यायालयाच्या नोटिसीला उत्तर दिले. राणा दाम्पत्याने अटींचा भंग केला असून जामीन रद्द करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. त्यानंतर सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन रद्द का करू नये यासाठी नोटीस बजावली होती. त्यालाच आज राणा दाम्पत्याने उत्तर दिले आहे.
राणा दाम्पत्याच्याव तीने आज सत्र न्यायालयात त्यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी कोर्टात उत्तर दाखल केले. राणा दाम्पत्याने न्यायालयाला सांगितले की, त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना तुरुंगात असताना 12 दिवस सहन कराव्या लागलेल्या यातना, ओढावलेला प्रसंग सांगितला. या प्रकरणाशी कोणत्याही मुद्यावर भाष्य केले नाही. त्यामुळे न्यायालयाच्या कोणत्याही अटींचा भंग झाला नसल्याचा दावा राणा दाम्पत्याने केला आहे.
राणा दाम्पत्याने यावेळी न्यायालयात सुनावणीच्या वेळी अनुपस्थित राहण्याच्या परवानगीचा अर्ज दाखल केला. न्यायालयाने राणा दाम्पत्याचा सुनावणीस अनुपस्थित राहण्याचा अर्ज मंजूर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जून रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची सध्या जामिनावर सुटका झाली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या कारणाखाली मुंबई पोलिसांनी राणा दांपत्याविरोधात आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यामध्ये आयपीसी कलम 124 (अ) अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल होता. त्यानंतर तब्बल 12 दिवसांनी दोघांनाही सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता.