दिल्ली दंगलीवर तातडीने चर्चा घेण्यास सरकार तयार नाही
नवी दिल्ली – दिल्लीत झालेल्या दंगलींबद्दल सभागृहात तातडीने चर्चा करा ही मागणी सरकारने आजही मान्य न केल्याने आजही विरोधकांनी राज्यसभेत गदारोळ केला. त्यामुळे आजही दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकुब करावे लागले. आता होळीच्या सुट्टीनंतर 11 मार्चला राज्यसभेचे कामकाज सुरू होईल.
आज सकाळी कामकाज सुरू होताच अध्यक्ष नायडू यांनी 8 मार्चच्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या विविध क्षेत्रात महिलांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच देशातील करोनाच्या प्रसाराबद्दल आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी संसदेत केलेल्या निवेदनाला प्रसार माध्यमांनी मोठी प्रसिद्धी देणे अपेक्षित होते पण प्रसार माध्यमांनी तशी प्रसिद्धी दिली नाही त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. त्यानंतर सभागृहाच्या पटालवर काही अहवाल आणि प्रस्ताव सादर करण्याची औपचारीकता पार पाडण्यात आली. व सभागृहाच्या नियमीत कामकाजाला सुरूवात करताच कॉंग्रेस सह अन्य विरोधकांनी दिल्ली दंगलींचा विषय उपस्थित करून गदारोळ सुरू केला.
अध्यक्ष नायडू यांनी त्यांना कामकाज सुरू करण्याची सुचना केली पण विरोधी सदस्यांनी त्यांच्या या सुचनेला न जुमानता अध्यक्षांच्या आसनासमोरील जागेत जमून घोषणाबाजी सुरू केली त्यामुळे नायडूंनी दिवसभरासाठी कामकाज तहकुब केले.