पुणे – दोन आठवड्यांपासून रेंगाळलेला नैऋत्य मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. राज्यातूनही मान्सून परतीच्या प्रवासाला गती मिळाली असून, सोमवारी (दि.26) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील बहुतांश भागातून मान्सूनने माघार घेतली आहे.
देशात यंदा पावसाने चार महिन्यांहून अधिक काळ मुक्काम ठोकला. दि. 28 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानपासून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला होता. मात्र, गेल्या पंधरा दिवसात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार झाल्यामुळे महाराष्ट्रासह ईशान्यकडील राज्यामध्ये पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास थांबला होता.
आता झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर व मध्य अरबी समुद्र, ओरिसा, मध्य महाराष्ट्र, या भागातून मान्सून परतीचा प्रवास सुरू असून, 28 ऑक्टोबरपासून संपूर्ण देशातून मान्सून माघारी फिरणार आहे. त्याचवेळी देशात ईशान्य मान्सूनची सुरवात होणार असून, तामिळनाडू, पॉन्डिचेरी, आंध्रप्रदेशाचा किनारी प्रदेश तसेच कर्नाटक आणि केरळ राज्यात या मान्सूनची हजेरी लावणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.