परिसरातील 60 टक्के बटाटा काढणी बाकी
पेठ – मागील काही दिवसांपासून सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात पाऊस पडत असल्याने बटाटे काढणीस अडचणी येत आहेत. परिसरातील अद्याप 60 टक्के बटाटा काढणीची कामे बाकी आहेत.
दुपारी पाऊस येत असल्यामुळे मजुरांना घराचा किंवा शेडचा आसरा घ्यावा लागत आहे. परंतु, यामुळे बटाटा काढणीचे कामे खोळंबली असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. सकाळी जमिनीत ओलावा असल्यामुळे बटाटा काढणीस आलेले मजूर सकाळी लवकर शेतात जात नाहीत. सकाळी 8 वाजण्याऐवजी साडेनऊ ते 10 वाजता मजूर बटाटे काढणीस येत आहेत. पावसामुळे जमिनीत थोडा जरी ओलावा झाला की तेथून पुढे बटाटा काढणीचे काम
ठप्प होतात.
अर्धा दिवस जरी काम केले तरी मजुरांना पूर्ण दिवसाची मजुरी द्यावी लागते. एका मजुराला दिवसाला 300 रुपये मजुरी द्यावे लागते. प्रत्येक शेतकऱ्याकडे किमान 15 ते तीस मजूर काम करताना दिसत आहेत. पावसाचे वातावरण तयार झाले की शेतकरी तणावात असतो. दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान पाऊस पडत असल्यामुळे बटाटे काढणीच्या कामात व्यत्यय येत आहे. सध्या शेतकरी बटाटे काढून ते सुरक्षित अरणीत कसे ठेवता येतील याचा विचार शेतकरी करीत आहेत.