“खडकवासला’तून 3,424 क्युसेक विसर्ग
पुणे – जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्गसुद्धा कमी करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी 34 हजार क्युसेक विसर्ग करण्यात येणाऱ्या खडकवासला धरणातून सध्या फक्त 3,424 क्युसेक विसर्ग होत आहे. त्याचबरोबर भीमा खोऱ्यांतील अनेक धरणांमधून विसर्ग कमी करण्यात आला आहे.
सध्या पानशेत आणि वरसगाव धरणातून अनुक्रमे 2 हजार 081, 2 हजार 387 क्युसेक विसर्ग होत आहे. टेमघर धरणातून 2,725 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. हे सर्व पाणी खडकवासला धरणात जमा होत असल्याने या धरणातून जादा विसर्ग करण्यात येत आहे.
याशिवाय भीमा खोऱ्यातील अन्य धरणांमध्ये पवना, चासकमान, भामा-आसखेड, आंद्र, वीर, भाटघर,कळमोडी, या धरणांतून विसर्ग सुरू आहे. हे प्रमाण अल्प आहे. हे सर्व पाणी उजनी धरणात जमा होत असल्याने हे धरण सुद्धा सध्या 100 टक्के भरले आहे. तेथून 80 हजार क्युसेक विसर्ग केला जात आहे.