आंबेगाव तालुक्यात संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
लाखणगाव- मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मका, कडवळ आणि तरकारी पिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
आंबेगाव तालुक्यात परतीचा पाऊस जोरदार बरसत आहे. याचा फटका तरकारी पिके आणि धना, मेथी या पालेभाज्यांनाही बसत आहे. पावसामुळे धना, मेथीवर करपा रोग आला असून, की पिके भुलू लागली आहेत. शेतात पाणी साचल्याने पिके सडू लागल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर शेतकऱ्यांचे अजून नुकसान होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे पाऊस उघडावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करीत आहेत.
मागील दोन दिवसांपासून जनावरेही गोठ्यातच असल्याने पावसामुळे जनावरांना बाहेर काढणे शक्य होत नाही. तसेच चारा पिके काढणे शेतकऱ्यांना कठीण बनले आहे. सध्या पेरणी केलेल्या ज्वारी पिकासाठी पाऊस फायदेशीर ठरणार असला तरी इतर तरकारी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.