पूर बाधितांकडून घरांची दुरुस्ती
पालिका प्रशासनाची उदासिनता समोर : अतिक्रमणांचा मोठा प्रश्न
ओढ्याचे पात्र अरुंद; भविष्यातही धोका संभवतो
पुणे – आंबिल ओढ्याला आलेल्या पुराच्यावेळी मित्र मंडळ कॉलनी ते दांडेकर पुलादरम्यान असणाऱ्या झोपडपट्टीत हे पाणी शिरले होते. ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. त्यांनी डागडुजी केली आहे; पण ओढ्यामध्ये राडारोडा अद्याप तसाच पडून आहे. त्यामुळे ओढ्याचे पात्र अरुंद होवून, त्यातून आगामी काळात मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
मित्र मंडळ कॉलनीच्या पुढे हा ओढा सारसबाग मार्गे दांडेकर पूल येथे जातो. यादरम्यान या ओढ्याच्या दुतर्फा घरे आहेत. त्यातच सानेगुरुजी नगरची भिंत सुद्धा या ओढ्याच्या काठाला आहे. ज्यावेळी पूर आला त्यावेळी ही भिंत पडली होती. मात्र, अद्यापही हे काम अपूर्ण आहे. याशिवाय जी दुतर्फा घरे आहेत त्यांच्या भिंती सुद्धा कोसळल्या होता. हा राडारोडा त्यावेळी ओढ्यात पडला होता. तो अद्यापही कायम आहे. नागरिकांनी पुन्हा घरे उभारली आहेत पण, कचरा अद्यापही ओढ्यात तसाच आहे.
दांडेकर पूल येथे एक छोटा पूल आहे. या पुलांचे सुद्धा नुकसान झाले होते. या पुलावरून दुचाकी जाऊ शकतात. या पुलाची भिंत सुद्धा खचली आहे. पुलाची दुरवस्ता झाली आहे. त्याची तातडीने डागडुजी करणे आवश्यक असताना अद्याप ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे धोकादायक पद्धतीने पुलावरून वाहतूक सुरू आहे.
कचराही ओढ्यात
सिमेंट वाळू आणि विटांचे खच ओढ्यांच्या दोन्ही बाजूला पडलेले अद्याप आढळतात. त्याचे डोंगर झाले आहेत. त्यामुळे हे जर तातडीने उचलले गेले नाहीत तर, आगामी काळात पुन्हा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आंबिल ओढ्यावरील अतिक्रमणे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात ती जास्त दिसत आहेत. झोपडपट्टी असल्याने सुद्धा येथील नागरिक कचरा मोठ्या प्रमाणावर ओढ्यात टाकतात. त्याचाही परिणाम हा प्रवाहावर होतो आणि अडचण निर्माण होत आहे.