पुणे – इंदिरानगर, अप्परसुपर, संभाजीनगर, चव्हाणनगर या भागांत जनता वसाहत भागातील घरांचे पुनर्वसन “गवनि’अंतर्गत झाले होते. त्यांना पुणे महानगरपालिकेने 99 वर्षे भाडेकराराने ही घरे दिली आहेत. मात्र, या घरांच्या हस्तांतरण व मालकी हक्काचा गेली अनेक वर्षे केवळ चर्चेत आणि लाल फितीच्या कारभारात पडून असून निवडून आल्यास पुढील तीन महिन्यांत हा प्रश्न मार्गी लावणार, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांनी या भागातील मतदारांना दिली.
कदम यांच्या प्रचारार्थ इंदिरानगर परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी येथील मतदारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी बहुतांश नागरिकांकडून या वसाहतीचा मालकी हक्काचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती कदम यांच्याकडे करण्यात आली.
वीर बाजी पासलकर कमान, अप्पर चौक, अप्पर परिसर, संभाजी नगर, चव्हाणनगर, सुपर परिसर, शेळके वस्ती, अण्णा भाऊ साठेनगर, पवननगर परिसर, खडक वस्ती, आईमाता मंदिर, पापळ वस्ती, महेश सोसायटी परिसरांत प्रचारफेरीत मतदारांशी कदम यांनी संवाद साधला. यावेळी सचिन तावरे, शशिकला कुंभार, विजय मोहिते, सिंधुताई बसवंत, गणेश मोहिते, रमेश सोनकांबळे,नितीन कदम, सौरभ माने, मच्छिंद्र बनसोडे, जयराज ठोंबरे यांच्यासह आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कदम म्हणाल्या, या भागात हजारो नागरिकांचे पुनर्वसन झालेले आहे. मात्र, त्यांनी वारंवार मागणी करूनही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे, ही बाब गंभीर असून मतदारसंघाची प्रतिनिधी म्हणून निवडून आल्यास पहिल्या तीन महिन्यांतच हा प्रश्न मार्गी लावण्यास आपले प्राधान्य राहिल. त्यासाठी पानशेत पूरग्रस्तांच्या धर्तीवर या भागातील नागरिकांनाही भाडे कराराऐवजी मालकी हक्काने घर देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे कदम म्हणाल्या.