राज्यपाल-मुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी
तिढा कायम; अंतिम वर्षाचे विद्यार्थी चिंतेत
पुणे – करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ व महाविद्यालय अंतिम वर्ष परीक्षेच्या निर्णयावरून राज्यपालांनी नाराजी दर्शविली आहे. यावरून राज्य सरकार आणि राज्यपाल यांची मते वेगवेगळी आहेत. अद्याप अंतिम वर्ष परीक्षेचा शासननिर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे एकूणच या प्रकरणात विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षातील साधारण 8 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आतापर्यंत सर्व सत्रात उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. मात्र, अंतिम वर्षातील अंतिम सत्र वगळता इतर सत्रांतील विषय बॅकलॉग राहिलेल्या सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांचे काय होणार, असा प्रश्नही यानिमित्ताने निर्माण होत आहे. त्यावरून उच्च शिक्षणमंत्र्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचे सांगत बॅकलॉग विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाचा निर्णय झाला, असे सांगत निश्वास सोडला. मात्र, त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षसंदर्भातील निर्णय विद्यापीठ कायद्याच्या तरतुदीनुसार घ्यायला हवा. कोणताही विचार न करता आणि कायदेशीर बाबी लक्षात न घेता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी आहे, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. या परीक्षेवरून राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील समन्वयाचा अभाव असल्याचे सध्याच्या परिस्थितीतून पुन्हा एकदा समोर आले आहे.
वैद्यकीयची परीक्षा, तर विद्यापीठाची का नाही?
एमडी, एमएस, पदव्युत्तर दंत, आयुर्वेद, होमिओपॅथीसह अन्य वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासून घेण्याचे नियोजन असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे जर वैद्यकीयच्या परीक्षा होऊ शकतात, तर विद्यापीठ व महाविद्यालयच्या परीक्षा का होऊ शकत नाही, असा प्रश्न शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.
परीक्षेचा प्रश्न मार्गी लावा
अंतिम वर्ष परीक्षेचा तिढा कायम आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर विविध विद्यार्थी संघटनेने स्वागत केले. तर काही शिक्षणतज्ज्ञांकडून विरोध होत आहे. अशा परिस्थितीत राज्यपालांनी संयुक्तपणे सर्व कुलगुरूंची बैठक घेऊन हा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा शिक्षणतज्ज्ञांकडून होत आहे. तर, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया अशाच आहेत.