परिसरातील धोकादायक जुन्या वाड्यांचा, घरांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, असे वाडे-घरे पाडण्याची गरज निर्माण झाली आहे. या धोकादायक वास्तूंमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. ओतूर ग्रामपंचायतकडून अशा घरांच्या आणि इतर वास्तूंच्या मालकांना सूचना अथवा नोटीस देण्याची गरज आहे. मात्र, अजूनही अशा हालचाली झालेल्या दिसून येत नाही.
ओतूरमधील जुने वाडे आणि घरे ऐतिहासिक संपत्तीचे साक्षीदार आहेत. आपल्या कलाकुसर सौंदर्याने नटलेले हे वाडे इतिहासाची साक्ष देत असले तरी ते जतन करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. हे करत असताना या वाड्यांची सुरक्षितता देखील महत्त्वाची आहे. या वर्षी झालेल्या मुसळधार आणि वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. परिसरात आणि गावांमधे पावसामुळे घर पडून,घराची छते कोसळून, भिंती कोसळून मृत्युमुखी पडल्याच्या दुर्दैवी घटना देखील घडलेल्या आहेत. मात्र, असे असताना गावठाण हद्दीत कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे समोर येत आहे.
अनेक घरांच्या भिंती पडायला लागल्यात, तर काही घरांच्या भिंती केव्हाही कोसळू शकतात व त्यातून मोठी दुर्घटना घडू शकते. अनेक जुनी घरे पाडून त्या जागी सिमेंट कॉंक्रिटच्या बिल्डिंग झाल्या मात्र आर्थिक स्थितीनुसार व यथाशक्तीनुसार दुरुस्तीकरण व बांधकाम करणे शक्य होत असल्याने मालक वर्गालाही दोष देऊन कसे जमेल, हा खरा सवाल आहे.