पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे पेंढा भिजल्याने पडला काळा
वाडा – खेड तालुक्यात यंदा पाऊस जास्त प्रमाणात पडूनही चांगले पीक आले असताना ऐन काढणीच्या वेळेस अवकाळी पाऊस पडल्यामुळे भात पिके भुईसपाट झाली आहे. मोठ्या प्रमाणात धान्य जमिनीवर सांडले असून जनावरांसाठी असणारा पेंढासुद्धा भिजल्यामुळे काळा पडला असून तो जनावरांना खाण्यास अयोग्य झाला असल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.
अवकाळी पावसामुळे खेड तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांचे एकमेव असलेल्या भातपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना भात पिकाची काढणी करताना शेतात पाणी असल्याने संपूर्ण पीक बाहेर काढावे लागत आहे, परिणामी मजूरही अधिक लागत असून भात काढणीला खर्चही जास्त लागत असल्याने शेतकरी आर्थिक विंवचनेत अडकला आहे. दरम्यान, खेडच्या पश्चिम भागात कृषी विभागाकडून पंचनामा करण्याचे काम सुरू झाले आहे.
खरोशी येथे भातपिकांच्या नुकसानीचा पंचनामा ग्रामसेविका नंदा गवारी-आंबेकर, कृषिसहायक डी. व्ही. डोलारे, तलाठी ए. जे. देवकर, तलाठी, एस. बी. रोडे, व्ही. एन. कौदरे यांच्या पथकाकडून करण्यात आला. तर जास्तीत जास्त व तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.