सातारा: दुष्काळाच्या मुद्द्यावर आम्ही कोणतेही राजकारण करत नाही. सरकारला लक्ष्य करण्याचा प्रश्न नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी, ही अपेक्षा आहे असे सडोतोड प्रत्युत्तर शरद पवार यांनी सरकारला दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दुष्काळाचे राजकारण करत असल्याचा आरोप सरकारमधील मंत्री माध्यमांसमोर करत आहेत. सातारा इथे पत्रकारांशी संवाद साधताना पवार यांनी हा आरोप साफ खोडून काढला.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, आमची सुरुवातच शेतकऱ्यांपासून झाली आहे. संकटसमयी त्यांच्या बांधावर जाऊन त्यांची विचारपूस केली नाही, तर आमच्यासारखे नतद्रष्ट दुसरे कोणी ठरणार नाही. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. आम्ही या सर्व गोष्टींचा आढावा घेतला आणि परिस्थिती मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. सरकारने आता गांभीर्याने दुष्काळाचा मुद्दा हाताळावा, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली.
तसेच, निवडणुकीच्या काळात ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. या घटनांबाबत शरद पवार यांनी आज चिंता व्यक्त केली. गुजरात व हैदराबाद येथील काही ईव्हीएम मशिन्सची तपासणी केली असता घड्याळाचं बटन दाबलं तर कमळाला मत गेल्याचे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलंय, त्यामुळे ईव्हीएम मशीन्सबाबत चिंता वाटते, असे प्रतिपादन पवार यांनी केले. सातारा येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला. पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका का होऊ शकत नाहीत, असा सवालही त्यांनी निवडणूक आयोगासमोर उपस्थित केला. मतमोजणी दरम्यान पाच मशिन्सची मोजणी न करता पन्नास मशिन्सची मोजणी व्हावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. मात्र दुर्दैवाने न्यायालयाने या मागणीचा स्विकार केला नाही, अशी खंतदेखील पवार यांनी यावेळी व्यक्त केली.