सातारा – लोक ज्यावेळी प्रश्नाला हात घालतात, त्यावेळी नेत्यांनाही प्रश्नांची दखल घ्यावीशी वाटते. सातारा शहरातील अनेक तरूणांनी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून सातारा- पुणे महामार्गाची दयनीय अवस्था मांडत टोलविरोधात मोहीम सुरू केली. या मोहिमेला नेटिझन्सचा प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. फेसबुकवरून सुरू झालेली मोहीम सोशल मीडियापुरती मर्यादित राहिली नाही.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्याबाबतचे आवाहन फेसबुकवरून करण्यात आले. निवेदन देण्यासाठीही अनेक जण जिल्हाधिकारी कार्यालयात आले. एखाद्या विषयासाठी प्रश्न मार्गी लावण्यासाठी तरूण संघटित होतात, ही साताऱ्यासारख्या शहराच्या दृष्टीने विलक्षण बाब ठरली. सोशल मीडियावरील जागरणाने कृती करण्यासाठी प्रवृत्त केले.
साताऱ्यातील दोन्ही राजेंनीही टोलविरूद्ध आवाज उठवला. ही आनंदाची आणि आश्चर्याचीही गोष्ट आहे. पण काही का होईना त्यांनी या प्रश्नात लक्ष घातले तर प्रश्नाचे उत्तर सापडण्यास नक्कीच मदत होऊ शकेल. मात्र, केवळ टोल बंद करणे हे या समस्येचे उत्तर नाही. चांगले रस्ते होणे आणि लोकांचा प्रवास सुखकर होणे महत्त्वाचे आहे, हेच प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजे. केवळ महामार्गच नव्हे तर शहरातील रस्त्यांकडेही लक्ष द्यायला हवे. पक्ष, संघटना किंवा इतर मतभेद बाजूला ठेवून या प्रश्नासह अनेक प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी आता सर्वांनीच एकत्रित येण्याची परंपरा सुरू करण्याची वेळ आली आहे.
सातारा आणि पुण्याचे नाते जुने आहे. सध्याच्या काळातही सातारा जिल्ह्यातील युवावर्ग शिक्षण किंवा नोकरीसाठी पुण्यात आहे. त्यामुळे प्रत्येक घराचा काही ना काही कारणाने पुण्याशी संपर्क आहे. त्यामुळेच सातारा- पुणे विनाथांबा बस सेवेसारखी सुविधा गर्दी खेचत असते. पुणे- सातारा या महामार्गावर रोजच हजारो प्रवासी प्रवास करतात. दुपदरी रस्ता चारपदरी झाला. नंतर सहा पदरीकरणाचे काम होतेय. तरीही रस्त्याची समस्या कमी झालेली नाही.
सहापदरीकरणाच्या काम पूर्ण होत आले तरी अनेक अडथळ्यांतून प्रवास सुरू आहे. यावर्षी झालेल्या अतिपावसामुळे तर दोन तासांच्या प्रवासासाठी किती वेळ लागेल, याची शाश्वती उरलेली नाही. महामार्गावरील खड्डे आणि वळणरस्त्यांनी प्रवासच बेजार झाला आहे. सेवारस्त्यांची स्थितीही दयनीय आहे. रोज हजारो प्रवासी जीव मुठीत घेऊन महामार्गावरून जात आहेत. राष्टीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराच्या मनमानीपुढे सारेच हतबल झाले आहेत. प्रवास सुखकर नाही किमान चांगला सुरक्षित व्हायला हवा, असे सर्वांनाच वाटत राहते. पण कुणालाही काही करणे शक्य होत नाही.
अशा अवस्थेत सोशल मीडियाचे व्यासपीठ आवाज उठवते. टोलविरोधात लोकांमध्ये जागृती करते. हे जिवंतपणाचे लक्षण आहे. परंतु, फक्त सोशल मीडियावरून पोस्ट टाकत प्रश्न मार्गी लागणार नव्हता. म्हणूनच जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याची कृतीही पार पडली. आता गरज आहे ती योग्य पाठपुराव्याची. त्याचवेळी साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टोलविरोधात भूमिका घेतली. या भूमिकेमुळे लोकांनी सुरू केलेल्या चळवळीला पाठबळच मिळावे. दोन्ही राजे ताकदवान आहेत. त्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे ठरविले तर खरोखरच चांगले होण्याची शक्यता आहे.
टोलविरोधी भूमिका घेणाऱ्या तरूणांनी टोल बंद करण्यापेक्षाही रस्ते आणि सुविधा चांगल्या द्याव्यात, असा आग्रह धरला आहे. चांगला रस्ता आणि चांगल्या सुविधा मिळून टोलही बंद झाला तर दुधात साखरच ठरणार आहे. पण सवंग लोकप्रियतेसाठी कोणीही काहीही करू नये, हीच लोकांची माफक अपेक्षा आहे. टोलवसुलीसाठी भांडणारे दोन्ही राजे पुढे आता टोलविरोधात पुढे आले आहेत, ही सातारकरांच्या दृष्टीने स्वागतार्ह गोष्ट आहे. पण प्रश्न फक्त टोलचा नाही, हे लक्षात घ्यायला हवे.
पूर्ण महामार्ग चांगला विकसित होण्यासाठी, प्रवास सुरक्षित व सुकर होण्यासाठी पाठपुरावा झाला पाहिजे.
चांगल्या सुविधांसह सुखकर प्रवास होण्यासाठी जे जे करावे लागेल, ते करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. या दोन्ही नेत्यांखेरीज जिल्ह्यात इतर मातब्बर नेते आहेत. आता तरी त्यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. पक्ष, संघटना वगैरे मतभेद बाजूला ठेवून जिल्ह्याला प्रगतीच्या दिशेने नेऊ शकणाऱ्या महामार्गाच्या समस्या मार्गी लावण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन लढा दिला तरच प्रश्न मार्गी लागणार आहे.
श्रेयवादापेक्षाही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे प्रयत्नच आता इथून पुढे व्हायला हवेत. जिल्ह्यातील लोक तुमच्यावर विश्वास टाकतात. तुम्हाला निवडून देतात. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असाल, आता जिल्ह्याच्या प्रश्नांसाठी एकत्र या, असे सूत्र स्वीकारण्याची गरज आहे. महामार्गाच्या निमित्ताने असे घडले तरच जिल्ह्याला काही आशादायी चित्र आहे. अनय्था “ये रे माझ्या मागल्या.’ निवडणूक झाली की “तुमचे तुम्ही जगा, आमचे राजकारण आम्ही करो,’ हीच राजकारण्यांची चाल कायम राहणार आहे. चांगल्या कामासाठी लोकांना चळवळ उभी करावी लागली आहे. आता त्या चळवळीला ताकद देण्याचे काम सर्वच स्तरातून झाले पाहिजे.
जरा शहरातील रस्त्यांचेही बघा…
पुणे- बंगळुरू महामार्गावरील सातारा ते पुणे या अंतरातील रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळेच टोलविरोधी आंदोलनाला धार येत चालली आहे. साताऱ्यातील दोन्ही नेत्यांनी भूमिका घेतल्यामुळे त्याला पाठबळ मिळेल. महामार्गाबाबत लोकांनी आणि नेत्यांनी जशी भूमिका घेतली आहे. तशीच भूमिका साताऱ्यासह जिल्ह्यातील सर्व मोठ्या गावांतील रस्त्यांबाबतही घेण्याची गरज आहे.
सातारा शहरासह प्रमुख मोठ्या शहरांमधील रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांनी लोक त्रस्त आहेत. महामार्गावरील टोलला विरोध करा, महामार्गाची सुविधा चांगली करा, त्याला कुणाचीच हरकत नाही. चांगला महामार्ग सर्वांनाच हवा आहे. महामार्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधिकरण किंवा ठेकेदाराशी संघर्ष करावा लागणार आहे. परंतु, शहरातील रस्त्यांचे प्रशासन स्थानिक पातळीवरच आहे. या प्रशासनाकडून काम करवून घेण्याची क्षमता स्थानिक नेतृत्त्वाकडे आहे. महामार्गाची अवस्था सुधाराच, पण शहरातील रस्त्यांकडेही लक्ष द्या आणि कायमस्वरूपी चांगले रस्ते द्या, अशी लोकांची अपेक्षा चुकीची नाही.