बक्सर (बिहार) : क्वारंटाईन सेंटरमध्ये घडलेल्या एका अनोख्या घटनेने बिहार राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी या सेंटरला भेट दिली. राजस्थानातून आलेल्या एक स्थलांतरीत रोज चाळीस पोळ्या आणि दहा प्लेट भात खात असल्याची माहिती मिळाल्याने या अधिकाऱ्यांनी त्याची खातरजमा केली.
या अधिकाऱ्यांना 23 वर्षीय अनुप ओझा या स्थलांतरीताच्या आहाराची माहिती मिळाली त्यावेळी अधिकाऱ्यांचाही विश्वास बसला नाही. त्यांना स्थानिक काहीतरी गफला करत असावेत असेच वाटले. त्यांनी त्या मांजवरी सेंटरला भेट दिली. त्यांनी याची देहा याची डोळा त्याचा अनुभव घेतला. त्यावेळी दहा जणांचे जेवण हा एकटाच हाणत असल्याचे स्पष्ट झाले.
बिहारमधील प्रख्यात पक्वान्न लिट्टी बनवले होते. त्या दिवशी या पठ्ठ्याने 85 लिट्टी गट्टम केल्याची माहिती आम्हाला मिळाली. एका व्यक्तीसाठी एवढ्या पोळ्या बनवून आचारीही कंटाळला आहे. त्यामुळे त्याच्या आहाराची थेट पाहणी करण्याचा आम्ही निर्णय घेतला, असे गट विकास अधिकारी ए.के. सिंह यांनी सांगितले.
येथे स्थलांतरीत मर्यादित असल्याने तेथे पुरवठा होणारे धान्य आणि भाजीपालाही मोजकाच आहे. त्यामुळे दहा जणांचे जेवण एकट्यानेच फस्त केल्याने तेथे निर्माण झालेल्या अडचणी सोडवण्यासाठी ही बाब मुख्य केंद्राला कळवण्यात आली. त्यामुळे या बाबीवर प्रकाश झोत पडला.
त्याला भूकेला ठेवू नका. त्याला पोटभर जेऊ द्या, अशा सूचना दिल्या आहेत. त्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. त्याला हव्या त्या सुविधा देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.