जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी; 31 व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहास प्रतिसाद
सांगली (प्रतिनिधी) – आरएसपीचे विद्यार्थी हे वाहतूक शाखेचे ब्रॅंड अँबेसडर आहेत. वाहतुकीचे नियम पाळून सांगली जिल्हा अपघातमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी येथे केले.
31 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, आरएसपीच्या विद्यार्थ्यांनी केलेले संचलन वाखाणण्याजोगे आहे. विनाअपघात सेवा, ही काळाची गरज आहे. अपघात न करता वाहन चालवलेल्या चालकांमार्फत इतरांना विनाअपघात सेवेबाबत माहिती दिली पाहिजे. अपघातमुक्त सांगली हे उद्दिष्ट ठेवून आपल्याला काम करायचे आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे म्हणाले, विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांना वाहतूक नियमांची माहिती दिली पाहिजे. रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले म्हणाल्या, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहात प्रत्येक शाळेत जाऊन वाहतूक नियमांबाबत प्रबोधन करण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत अपघाताच्या प्रमाणात 18 टक्के घट झाली आहे. पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. विनाअपघात सेवा करणारे ट्रक, रिक्षा व एसटीचालक यांचा सत्कार करण्यात आला. सांगली व मिरजेतील आरएसपीच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले.