राज्यातील पहिलाच प्रयोग : जिल्ह्यातील 400 हेक्टर वनजमीन अतिक्रमणमुक्त
पुणे – “वनजमिनींवर झालेली अतिक्रमणे अतिशय नियोजनबद्धरित्या हटवून, अतिक्रमणमुक्तीची यशस्वी मोहीम पुणे वनविभाग राबवत आहे. वनजमीन अतिक्रमणमुक्त करण्यासाठीचा हा पहिलाच प्रयोग राज्यात पुणे वन विभागांतर्गत राबविला जात असून, हा “पुणे पॅटर्न’ लवकरच संपूर्ण राज्यात राबवला जाणार आहे.
वन विभागातर्फे वन जमिनींवरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात गेल्या दोन वर्षांपासून मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या सुमारे 400 हेक्टर वनजमिनी अतिक्रमणमुक्त झाल्या आहेत. यामध्ये इंदापूरमधील 270 हेक्टर, बारामती येथील 72.09 आणि दौंड येथील 36.71 हेक्टर वन जमिनींचा समावेश आहे. या वनजमिनींची किंमत सुमारे 300 कोटी इतकी आहे. या व्यतिरिक्त वन विभागातर्फे इतर भागांमधील जमिनींची ओळख आणि मोजमाप करण्याचे काम सुरू असून लवकरच या जमिनींवरील अतिक्रमण हटविण्यासाठीदेखील प्रयत्न सुरू असल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
विभागाने केलेल्या या कामाच्या यशाची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे. नुकत्याच नागपूर येथील वन विभागाच्या मुख्यालयात झालेल्या वनाधिकाऱ्यांच्या बैठकीत या कामाबाबत उपवनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी यांनी सादरीकरण केले. या मोहिमेचा प्रभाव आणि कार्यपद्धती लक्षात घेत, वनजमिनींच्या अतिक्रमणमुक्तीची पद्धत राज्यात सर्वत्र राबविली जाणार असून, यासाठी पुणे वन विभागाकडून आवश्यक ते मार्गदर्शन दिले जाणार आहे.
“वन विभागाच्या अखत्यारीतील जमिनींवर वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम राबविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. मात्र, वन जमिनींची योग्य मोजमाप नसल्याचे आणि त्यामुळे वन जमिनींवर अतिक्रमण झाल्याचे वनाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तातडीने वन जमिनींवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम वन विभागाकडून हाती घेण्यात आली आहे. वन विभागाची मोठी टीम या कामात सहभागी झाली आहे. अजूनही बरेचसे काम बाकी असून, ही मोहीम अशाचप्रकारे सुरू राहणार आहे.’
– ए. श्रीलक्ष्मी, उपवनसंरक्षक