यवत येथील सभेत रमेश थोरात यांचा विरोधकांवर घणाघात
केडगाव – भीमा सहकारी साखर कारखान्याचे वाटोळ नेमके कुणामुळे झाले हे न समजण्या इतपत दौंड तालुक्यातील जनता भोळी नाही असा हल्लाबोल, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांनी आमदार राहुल कुल यांचे नाव न घेता केला.
दौंड विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ यवत येथे मंगळवारी (दि. 15) सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी वरील टीका केली. याप्रसंगी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे, युवती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर आणि तालुक्यातील पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
रमेश थोरात म्हणाले की, कारखाना रमेश थोरात यांच्यामुळे अडचणीत आला असे विरोधक वारंवार सांगतात, त्यांना मी सांगू इच्छितो की 2000 ते 2001मध्ये कारखान्याचा अहवाल माझ्याकडे आहे, त्यावेळी कारखान्यावर 38 कोटी रुपये कर्ज होत आणि सुमारे 75 कोटी रुपयांची साखर शिल्लक होती त्यानंतर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी तुमच्याकडे कारखाना दिला मागील 18 वर्षे तुम्ही कारखान्यावर सर्वेसर्वा आहात.
सध्य स्थितीला भीमा कारखान्यावर साडेचारशे कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज असून कामगारांचे पगार, ट्रॅक्ट्रर मालक व शेतकऱ्यांची देणी, बॅंकांचे कर्ज अशी मोठी रक्कम थकीत आहे. सभासदांना दिली जाणारी सवलतीची साखर बंद झाली, ही परिस्थिती कोणी निर्माण केली? याचे खरे उत्तर द्यावे. आपण माझ्यावर जो कारखाना अडचणीत आणल्याचा आरोप करीत आहात, त्याला मी घाबरत नाही. “कर नाही त्याला डर कशाला’ या तत्वावर चालणारा मी कार्यकर्ता आहे, असे त्यांनी नमूद केले.