राज्यमंत्री आमदार विश्वजीत कदम यांची प्रतिक्रिया
पुणे – भाजपच्या आरोपांना मतांच्या माध्यमातून जनतेनेच उत्तर दिले असून, आम्ही उत्तर देण्याची गरजच आता उरली नाही, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केली.
पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर आणि पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड हे विजयी झाले. त्यानिमित्ताने पुण्यामध्ये कॉंग्रेसभवनमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते याठिकाणी जमा झाले आणि नाचून, पेढे, लाडू वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदे आधी आसगावकर यांचा कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार, प्रशांत बधे, माजी नगरसेविका कमल व्यवहारे, बाळासाहेब बोडके आदी उपस्थित होते.
“हिंमत असेल तर एकएकटे लढा’, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर दिले. त्याविषयी विचारले असता, कदम म्हणाले की, भाजपच्या आरोपांना आम्हांला उत्तर द्यायची गरजच आता उरली नाही. जनता काय म्हणते आहे, हे निकालातूनच स्पष्ट झाले आहे.
महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी आणि करोनाकाळात केलेले आरोग्यविषयक काम याची जाण जनतेने ठेवली त्याची पोचपावती या निवडणुकीतील विजयाच्या रूपाने जनतेने दिली आहे, असे कदम यांनी नमूद केले.
गेल्या 31 वर्षापासून शिक्षक म्हणून नोकरी करत आहे. आई-वडीलही शिक्षक आहेत. महाविकास आघाडीने चांगली संधी दिली आहे, चांगले काम करून त्याचे सोने करेन. शिक्षक बंधू-भगिनींनीही निवडणुकीत चांगले सहकार्य केले आहे. करोना प्रादुर्भावासारख्या परिस्थितीतही पाच जिल्हे 58 तालुके फिरून प्रचार केला, ही गोष्ट सोपी नव्हती. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.
– प्रा. जयंत आसगावकर, विजयी-शिक्षक मतदार संघ