कृती समिती-अधिकाऱ्यांच्यात गुरुवारी बैठक; पुढची दिशा तेव्हा ठरवणार
कराड (प्रतिनिधी) – कोल्हापूर नाक्यावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी व त्यामुळे अपघातात जाणारे निष्पाप जीव, यावर कराड व मलकापूरसह परिसरातील नागरिकांनी उठाव केला आहे. सध्याच्या उड्डाणपुलावर दुहेरी वाहतूक करण्याबरोबरच अन्य महत्त्वाच्या विषयांवर कृतीसमितीमध्ये चर्चा झाली. ही समिती प्रशासकीय अधिकाऱ्यां बरोबर गुरुवारी बैठक घेणार असून या बैठकीत होणाऱ्या निर्णयावर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. रविवार, दि. 17 रोजी कृती समितीची कोल्हापूरनाक्यावरील उड्डाणपूलाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी व पुढील दिशा ठरवण्यासाठी येथील विश्रामगृहात सकाळी बैठक पार पडली. यावेळी कराड, मलकापूर शहरासह परिसरातील गावातील नागरिक उपस्थित होते.
गेल्या काही वर्षापासून कोल्हापूर नाक्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. दिवसेंदिवस या वाहतुकीच्या कोंडीत वाढ होत आहे. परिणामी येथे दररोज छोटे-मोठे अपघात घडत असून यात निष्पाप लोकांचा बळी जात आहे. 2017 पासून कोल्हापूर नाक्यावर तब्बल 16 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. असे असले तरी प्रशासकीय पातळीवर याकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. त्यामुळे अखेर जनतेचा लढा उभारला असून येणाऱ्या काळात या कृती समितीमार्फत आंदोलनाचे स्वरूप टप्प्याटप्प्याने बदलणार आहे. जोपर्यंत कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपूल होत नाही, तोपर्यंत कृती समिती गप्प बसणार नाही, असे आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आले.
रविवारी सकाळी कृती समितीच्या बैठकीत अनेक सकारात्मक विषयांना हात घालत यावर पर्याय सुचवण्यात आले. त्यामध्ये महत्त्वाचा पर्याय म्हणजे सध्या कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपूल आहे. त्यावर कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक वळवून कोल्हापूर नाक्यावरील वाहतूक काही अंशी कमी होईल, याबाबत चर्चा करण्यात आली. या ठिकाणी उड्डाणपूल मंजूर आहे, मात्र येथील कामाच्या निविदा अजूनही निघाल्या नाहीत. त्यामुळे कृती समितीने याबाबत प्रशासकीय अधिकारी यांच्याशी बैठक आयोजित केली असून त्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे. कोल्हापूर नाक्यावरील महामार्गाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या उप मार्गावरील अतिक्रमणे काढणे, अवैध वाहतुकीला आळा बसवणे, तेथील बस स्टॉप अन्यत्र हलवणे यासह अन्य विषयांवर चर्चा झाली. तसेच नगरपालिकेने पंकज हॉटेलच्या मागील बाजूस प्रस्तावित चाळीस फुटाचा रस्ता आहे.
ती जागा ताब्यात घेऊन लवकरात लवकर रस्ता करावा, यावरही कृतीसमितीने चर्चा केली. वाहतूक कोंडीचा त्रास शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा होत असतो. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर लक्ष वेधण्यासाठी प्रत्येक शाळा व महाविद्यालयांमध्ये वाहतूक कोंडीबाबत जनजागृती करून या आंदोलनाला चळवळीचे स्वरूप कसे प्राप्त होईल? यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही कृतीसमितीच्या बैठकीत निश्चित झाले. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून कराड व मलकापूर शहर व त्याच्या आसपासच्या गावातील लोकांना या आंदोलनात सामील करण्यासाठी सोशल मीडिया सेल तयार करण्याचे ठरविण्यात आले.
नगराध्यक्षांची दांडी
कोल्हापूर नाक्यावर रोज छोटे-मोठे अपघात होत असतात. यात बऱ्याच निष्पापांना जीव गमवावा लागत आहे. या ज्वलंत सामाजिक प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी कराड, मलकापूरसह परिसरातील नागरिक एकवटले. त्यांनी यावर उपाय सुचवले. या बैठकीत नगराध्यक्षांची उपस्थिती महत्त्वाची होती. मात्र कराड शहराच्या प्रश्नांबाबत नगराध्यक्षांना काहीही देणे घेणे नाही, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. कारण काम कमी आणि मिरवणे जास्त, अशी त्यांची ख्याती आहे. जिथे मिरवायला मिळते, तेथेच त्या उपस्थित असतात. उड्डाणपुलाचा विषय सामाजिक असल्याने येथे यांना फारसे मिरवायला मिळणार नाही, अन याबाबत त्यांना काही देणं घेणं ही नाही. त्यामुळे त्यांनी या बैठकीला दांडी मारल्याची चर्चा शहरात सुरू होती. नगराध्यक्षा न आल्याने कृती समितीच्या बैठकीतही त्यांच्या विषयी नाराजी व्यक्त करण्यात आली.