मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील चिकोत्रा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील 52 गावांचा समन्यायी पाणीवाटपाच्या पथदर्शी प्रकल्पात समावेश करण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली जाईल व मंत्रिमंडळाचा ठराव करुन मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज दिली.
कागल मतदारसंघाच्या चिकोत्रा प्रकल्पामध्ये समन्यायी तत्त्वावर पाणीवाटपाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याबाबत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी पाटील यांनी ही माहिती दिली.
चिकोत्रा पाणलोटातील 52 गावांच्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया पूर्ण करुन आरखडा तयार करा. या प्रकल्पातील गावांचे सर्व्हे करतांना पारदर्शकता आणि अचूकता असली पाहिजे. हा प्रकल्प दीर्घकालीन परिणाम करणारा असून आरखडा तयार करताना दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना श्री. पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत ठराव करुन केंद्र सरकारला पाठविण्यात येईल, असे आश्वासन देखील पाटील यांनी समन्यायी पाणी हक्क परिषदेला दिले.