बॅंकांच्या दृष्टिकोनातून होऊ शकतो चिंतेचा विषय
पुणे – सन 1980 नंतर जन्मलेल्या तरुणांकडून बॅंकांमधून कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यातील बरेच कर्ज पुरेशा तारणाअभावी घेतले गेले असण्याची शक्यता असल्यामुळे बॅंकांच्या दृष्टिकोनातून हा चिंतेचा विषय असू शकतो.
1980 च्या अगोदर जन्मलेल्या व्यक्तींच्या तुलनेत 1980 नंतर जन्मलेल्या व्यक्तींकडून कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले असल्याचे “ट्रान्स युनियन सिबिल’ या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. नवतरुणांकडून घेतले गेलेले कर्ज 58 टक्क्यांनी वाढले आहे तर, इतरांकडून घेतलेल्या कर्जात केवळ 14 टक्के वाढ झाली आहे.
देशातील खासगी आणि सरकारी बॅंका गेल्या 5 वर्षांपासून वाढलेल्या अनुत्पादक मालमत्तेशी ही झुंज देत असतानाच हा नवा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे अहवालात म्हटले आहे. देशातील बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता 8 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.
अगोदरच कर्ज घेऊन उत्पादनक्षमता वाढविल्यामुळे मोठ्या कंपन्या अडचणीत आल्या आहेत. कारण त्यांच्या वाढलेल्या उत्पादनाला पुरेशी मागणी नाही. या कंपन्या आपल्यावरील कर्ज कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत तर, नवे कर्ज घेण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे बॅंका या कंपन्यांना जास्त कर्ज देण्यास उत्सूक नाहीत. मात्र, बॅंका किरकोळ कर्ज देण्याबाबत गेल्या दोन वर्षांपासून पुढाकार घेत आहेत. त्यातच नवतरुणांकडून कार, बाईक आणि इतर वस्तूंसाठी कर्जाची मागणी वाढली आहे. त्यामुळे बॅंकांनी या तरुणांना बरेच कर्ज दिलेले आहे.
पुरेसे तारण नाही
त्यात चिंतेची बाब ही आहे की, यासाठी पुरेसे तारण दिले गेलेले दिसत नाही. भारताचा सध्याचा बचत दर जितका आहे त्यापेक्षा घेतलेले कर्ज जास्त असल्याचे दिसत आहे. तरुणांकडून घेतलेल्या कर्जापैकी 72 टक्के कर्ज हे क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज या माध्यामातून घेतलेले दिसून येते. बॅंकांनी या कर्जाच्या खात्याकडे बारकाईने लक्ष देत राहण्याची गरज आहे. अन्यथा या एकत्रित कर्जाचा नकारात्मक परिणाम मोठा होऊ शकतो, असे या अहवालात सूचित केले आहे. जमेची बाजू म्हणजे हे तरुण लोक आपल्या क्रेडिट स्कोरकडे वेळोवेळी लक्ष देतात. मात्र, तरीही बॅंकांनी ताक फुंकून पिण्याची गरज असल्याचे अहवालात नमूद केले आहे.