पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवारांच्या सभांकडे लक्ष
सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघ व जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमधील राजकीय रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. जाहीर प्रचारासाठी अवघे तीन दिवस उरल्याने राजकीय मैदान मारण्यासाठी दिग्गजांकडून “पॉवर’ आजमावली जाणार आहे.
भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींची व राष्ट्रवादीने अध्यक्ष शरद पवारांची, अशा दोनच सभा प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ठेवून जिल्ह्याच्या राजकारणाला निर्णायक वळण देण्याचे आडाखे मांडले आहेत. वैयक्तिक टीकाटिपणीत प्रचार व्यस्त असून जिल्ह्याच्या विकासाचे मुद्दे कोसो दूर आहेत.
कोपरा सभा, मेळावे, पदयात्रा, जाहीरनामे या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न राजकीय पक्ष करत आहेत. निवडणुकीची लढाई आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले व राष्ट्रवादीचे दीपक पवार यांच्यात चुरशीचा सामना असून दोन्ही उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत.
माणमध्ये जयकुमार गोरे, शेखर गोरे व प्रभाकर देशमुख अशी तिरंगी लढत असून तेथे तिघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कोपरा सभा व आरोप-प्रत्यारोपांनी तेथील संघर्ष अधिक टोकदार झाला आहे. कोरेगाव मतदारसंघात शिंदे विरुद्ध शिंदे असा संघर्ष पेटला आहे. आ. शशिकांत शिंदे यांच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न झाला. आ. शिंदे यांना तोडीस तोड देताना भाजपच्या महेश शिंदे यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली आहे. कराड दक्षिण व कराड उत्तरमध्ये भाजप-शिवसेना महायुती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे.
दक्षिणेत कॉंग्रेसच्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात महायुतीच्या डॉ. अतुल भोसले यांनी जोर लावला आहे. त्यात कॉंग्रेसचेच माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव ऍड. उदयसिंह पाटील यांनी बंडखोरी करून दंड थोपटले आहेत. कराड उत्तरमध्ये भाजपच्या मनोज घोरपडे यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांना कडवे आव्हान देण्याचे महायुतीचे मनसुबे धुळीस मिळण्याची शक्यता आहे.
पाटणमध्ये शिवसेनेचे आ. शंभूराज देसाई व राष्ट्रवादीचे सत्यजितसिंह पाटणकर यांच्यात पारंपरिक लढत आहे. फलटणमध्ये यावेळी प्रथमच रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अभेद्य गढीत महायुतीने आव्हान उभे केले आहे. माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे निकटवर्तीय दिगंबर आगवणे यांनी रामराजेंचे अत्यंत जवळचे सहकारी आ. दीपक चव्हाण यांच्याविरोधात जंग जंग पछाडले आहे.
सातारा जिल्ह्यात बालेकिल्ला राखण्यासाठी राष्ट्रवादीने तर तो उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेऊन त्यांच्या करिश्म्याचा उपयोग भाजपला करून घ्यायचा आहे. ही सभा भव्यदिव्य होण्यासाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे. गुरुवारी साताऱ्यात होणाऱ्या मोदींच्या सभेत कोणतीही कसर राहू नये, याकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे. विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजेंच्या विजयाची भाजपला खात्री आहे; परंतु उदयनराजे भोसले यांना मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत मतमतांतरे आहेत.
उदयनराजेंनी दहा दिवसांत सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी दोन वेळा दौरे करून 44 मेळावे घेतले. राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनीसुद्धा आपल्या वयाची तमा न बाळगता चाळीसहून अधिक सभा, मेळावे घेतले आहेत. दि. 18 रोजी जिल्हा परिषद मैदानावर शरद पवार यांची होणारी सभा राष्ट्रवादीसाठी निर्णायक असेल. दि. 19 रोजी सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचारांची सांगता होणार असून पुढील 72 तास जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे आहेत.
शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या दिग्गजांच्या सभांमध्ये जिल्ह्यातील मूलभूत व प्रलंबित प्रश्नांवर भर दिला जाण्याची शक्यता कमीच आहे. उलट राजकीय घोटाळ्यांवरून टीका व वैयक्तिक उखाळ्यापाखाळ्या काढल्या जाण्याची दाट शक्यता आहे. महायुतीने साताऱ्यात जाहीरनाम्याचे मतदारांना वाटप सुरू केले आहे. राज्य पातळीवरील नेत्यांनीहीज जिल्ह्यात प्रचाराचे रान पेटवल्याने प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीच्या निकालाविषयी गावागावात, चौकाचौकात चर्चा रंगल्या आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने भाकिते वर्तवित आहे. सोमवारी (दि. 21) मतदान होत असून 24 ऑक्टोबरलाच निकालानंतरच जिल्ह्यातील राजकीय चित्र स्पष्ट होईल.