मुंबई – महाविकास आघाडी सरकारच्या प्रयत्नाने पुण्यात फोक्सकॉन प्रकल्पाची गुंतवणूक झाली. मात्र ईडी सरकारने हा प्रकल्प गुजरात राज्याला आंदण म्हणून दिला, असा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी केला आहे.
या उलाढालीमुळे लाखो तरूणांच्या हातून रोजगाराची संधी गेली आहे. राज्यातील तरूणांचा विश्वासघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला, अशी टीका त्यांनी केली.
याआधीदेखील ईडी सरकारने राज्यातील जनतेला मूर्ख बनवण्याचे काम केले आहे. बीकेसीमधील काही हेक्टर जमीन बुलेट ट्रेनला दिली, मेट्रो कारशेडसाठी आरे जंगलतोड करण्यासाठी विकासकांना आमंत्रित केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नये, असे विद्या चव्हाण म्हणाल्या.
राज्यातील गरिबांची जे सावकार लूट करत होते त्यांच्या जाचातून जनतेची सुटका करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मदत केली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लुटारुंच्या सरकारला मदत करण्यासाठी महाराष्ट्रातील तरुण-तरूणींसाठी आणलेला प्रकल्पच आंदण म्हणून दिला आहे. राज्य सरकार मोठ्या प्रमाणात आपली फसवणूक करत आहे, याचा विरोध करण्यासाठी तरुणांनो जागे व्हा, असे आवाहन विद्या चव्हाण यांनी केले आहे.